ठाणे : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. त्यातच आता ठाण्यातही शिवसेना ठाकरे पक्षाकडून युतीचे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे तथा उबाठाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही समाज माध्यमावर या युतीचं स्वागत केलं आहे. या बॅनरचं दोन्ही गटाकडून स्वागत केलं जात आहे.
राज ठाकरेंनी दिला टाळीचा प्रस्ताव : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये किरकोळ भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्र हितासाठी गरज पडल्यास शिवसेना ठाकरे पक्षासोबत जाण्याची इच्छा दर्शवली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एका अर्थी सहमती दर्शवली. तेव्हापासून संपूर्ण राज्यामध्ये ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का याविषयी चर्चांना सुरुवात झाली आहे. ठाण्यात शिवसेना ठाकरे पक्षाची आणि मनसेची सध्या राजकीय परिस्थिती एकच आहे. दोन्ही पक्ष आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत. अशावेळी शिवसेना आणि भाजपाला रोखायचं असेल तर, दोन्ही ठाकरेंची युती झाल्यास ते संयुक्त ठरेल, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे.
राज ठाकरे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य : ठाण्यात मनसेनं याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असं मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी सांगितलं. या प्रतिक्रियेनंतर रविवारी ठाण्यात शिवसेना ठाकरे पक्षानं बॅनर झळकवत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचं स्वागत केलं. समाज माध्यमांवरही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित असलेले फोटो व्हायरल करत भावनात्मक पोस्ट केल्या जात आहेत.
महाराष्ट्र हितासाठी दोन पावले पुढं टाकले : "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं झाल्यास त्याचा निर्णय हे दोन्ही बंधू घेतील. दोन्ही बंधूनी महाराष्ट्र हितासाठी दोन पावलं पुढं टाकले असतानाच अन्य नेत्यांनी भाजपाला फायदा होईल अशी टीकाटिप्पणी करू नये," असं आवाहन उबाठाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी समाज माध्यमावर केलं आहे.
हेही वाचा :