पुणे- पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला असून, दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झालाय, यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे. यातील दोन पर्यटक हे पुण्याचे असून, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा यात मृत्यू झालाय. या घटनेबाबत देशभरातून रोष व्यक्त केला जातोय. असं असताना याबाबत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
देश या संकटातून मजबुतीने पुढे जायला हवा : ते म्हणाले की, ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये कृत्य केलंय, त्यामुळे देश दुःखात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून याचं उत्तर देण्याची आशा व्यक्त केलीय. तसेच देश या संकटातून मजबुतीने पुढे जायला हवा आणि जे दोषी आहेत, त्यांना जशास तसं उत्तर देण्यात यावं, यासाठी बाप्पाचा आशीर्वाद मिळावा तसेच बाप्पाच्या आशीर्वादाने देश या संकटातून बाहेर यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात याचं उत्तर देण्यात येईल आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शक्ती देण्यात यावी ही प्रार्थना दगडूशेठ बाप्पा चरणी करण्यात आल्याचं यावेळी जे. पी. नड्डा म्हणाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घेतले : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घेतले, यावेळी मंदिरात अभिषेक करत पहलगाम घटनेबाबत जशास तसं उत्तर देण्यासाठी पंतप्रधानांना शक्ती मिळावी ही प्रार्थना करण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते.
काश्मीरचं पूर्वीचं वैदिक नाव कशपमीर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आलं, यावेळी जी प्रार्थना करण्यात आली, त्याबाबत राहुरकर गुरुजी म्हणाले की, आज जे. पी. नड्डा पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते गणपती बाप्पाचा अभिषेक करण्यात आलेला आहे. या अभिषेकामध्ये सांगण्यात आलं आहे की, संपूर्ण भारतीयांची एकच भावना आहे की आपल्या काश्मीरमध्ये ज्याचं पूर्वीच वैदिक नाव कशपमीर आहे, त्याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावा आणि आपल्या काश्मीरमधील लोकांना सद्बुद्धी प्राप्त व्हावी.
हेही वाचा -