चंद्रपूर : लग्न म्हटलं की समोर येते ते वर वधू यांचे भरजरी वस्त्र, दागदागिन्यांची खरेदी, धुमधडाका, आतिषबाजी, हादरवून सोडणारे डीजे, फोटो सेशन, पंचापक्वान असलेला मेनू असे चित्र आणि त्यासाठी लाखोंची उधळपट्टी केली जाते. आता अशा लग्नाचा ट्रेंड समाजात रूढ झालेला आहे. मात्र या प्रवाहाला नाकारत चंद्रपुरात एक लग्न अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले. कुठलाही फाजील खर्च न करता सत्यशोधक पद्धतीने हे लग्न करण्यात आले. तर लग्नाच्या खर्चाच्या पैशात गावातील पाणंद रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी गावातील पाणंद रस्त्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीत जाणे अवघड होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम होती. मात्र हा रस्ता तयार झाल्याने शेतकऱ्यांना आता आपल्या शेतात जाणे सुकर झाले आहे. या लग्न सोहळ्याची आता पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे.
धडपड्या युवकाची गोष्ट : श्रीकांत गणपत एकुडे हा एक धडपड्या युवक. कृषी या विषयात पदव्युत्तर शिक्षण (M.Sc.) केल्यावर नोकरीच्या नावावर चाकरी न करता घरच्याच शेतीवर काम करण्याचे त्याने ठरवले. चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर आणि वर्धा जिल्ह्याच्या उंबरठ्यावर असलेले वरोरा तालुक्यातील सुसा नावाचे त्याचे छोटेसे गाव. याच गावात वडिलांचा आधार देत त्याने पारंपरिक शेतीला आधुनिकता आणि प्रयोगशीलतेची जोड देत शेती सुरू केली. चंद्रपुरात धान, कापूस, सोयाबीन आणि गहू हे मुख्य पीक आहे. मात्र श्रीकांतने मिरची या पिकावर भर देत त्याची लागवड करणे सुरू केले. आज तो मिरची स्वतः उत्पादित करतो आणि त्यातून तयार केलेले तिखट बाजारात विकतो. याच्या पॅकेजिंगचे नाव त्याने आपल्या दिवंगत आजीच्या नावावर सीताई असे ठेवले आहे. आजीने आपले कुटुंब घडविण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांच्या कार्याबाबत आदर व्यक्त करण्यासाठी त्याने हे नाव दिले. मात्र श्रीकांत या होतकरू तरुणाचे काम एवढ्यापुरतेच नाही. तो फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पाईक आहे. या विचारांनी प्रेरित होऊन तो सामाजिक चळवळीत सक्रिय आहे. याच चळवळीच्या माध्यमातून त्याने ब्राईट एज नावाची एक संस्था उभारली असून चिमूर तालुक्यातील भिसी गावात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी त्याने एक वसतिगृह सुरू केले आहे. सध्या येथे ५५ विद्यार्थी निःशुल्क या सेवेचा लाभ घेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. सोबत याच वसतिगृहात वाचनालय उभारले असून सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय खुले आहे. याशिवाय, स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देखील या माध्यमातून दिले जाते.

असा ठरले लग्न : श्रीकांतचे लग्न विवाह यवतमाळ जिल्ह्यातील मोझर या गावचे गोपीकिसन गरमडे यांची कन्या अंजली हिच्याशी ठरले. दोन्ही कुटुंबाचे सूत जुळून आले. त्यामुळे सर्वसामान्य लग्नासारखे यांचेही लग्न धूमधडाक्यात होणार अशी अपेक्षा होती. मात्र श्रीकांतने यात फारकत घेतली. कुठल्याही प्रकारचा हुंडा, अवाजवी खर्च न करता महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक पद्धतीने हे लग्न व्हावे, यासाठी कुठल्याही कुटुंबाने कुठलाही खर्च करता कामा नये, अशी अट श्रीकांतने घातली. वधू पक्षाचे गरमडे यांना थोडा संकोच वाटला. मात्र अखेर त्यांनी या संकल्पनेला होकार दिला.
साध्या पद्धतीने लग्न सोहळा : २८ एप्रिलला सुसा या गावात अत्यंत साध्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. एकुडे परिवारातील ८४ लोक, काही मित्रमंडळी गरमडे कुटुंबातील आप्तस्वकीय आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले. सत्यशोधक पद्धतीने मंगलाष्टक म्हणून या सोहळ्याची औपचारिकता पार पडली. हॉल किंवा सभागृहात हा सोहळा न घेता गावाच्या परिसरात हा सोपस्कार पार पाडला गेला. उन्हाचे चटके उपस्थितांना सहन करावे लागू नये, यासाठी सायंकाळी हा विधी पार पाडला गेला.

आहेर म्हणून पुस्तके आणि फळझाडांची भेट : या लग्नसोहळ्यासाठी आमंत्रित पाहुण्यांना आहेर आणण्यासाठी स्पष्टपणे नकार देण्यात आला. त्याऐवजी वर आणि वधूला शुभेच्छा देण्यासाठी पुस्तके किंवा रोपटे देण्याचा आग्रह धरण्यात आला. पाहुण्यांनी देखील त्यांना हीच भेट देऊन नव दाम्पत्याला आशीर्वाद दिले.
फळझाडांची शेतात लागवड : सत्यशोधक लग्न सोहळ्यात तब्बल ९० पेक्षा जास्त फळझाडे भेट स्वरूपात दिली. यामध्ये ३६ प्रकारच्या विविध फळझाडांचा समावेश आहे. विदर्भात पिकत असलेल्या फळांसोबतच स्टारफ्रूट, वॉटर एप्पल, चकोत्रा, मलबेरी, लिची, रबर, अशा फळझाडांचा सुद्धा समावेश आहे. तर चारोळी कवट, बेल, मोह या रानमेवा फळझाडांचा सुद्धा समावेश आहे. हे सर्व झाडे श्रीकांत यांनी शेतात लावली आहेत.
सत्यशोधक लग्न आणि गावकऱ्यांचा वर्षांचा प्रश्न सुटला : सुसा या गावात पाणंद रस्ता नसल्याने शेतीत पोचण्यास येथील शेतकऱ्यांना कमालीच्या अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांची बैलगाडी देखील त्यांच्या शेतात जाऊ शकत नाही. बियाण्याची ५० किलोंची पोती शेतकऱ्यांना आपल्या पाठीवर घेऊन शेतात जावे लागते. त्यामुळे या रस्त्याची नितांत गरज होती. मात्र अनेक कारणांमुळे या रस्त्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. श्रीकांतने आपल्या लग्नखर्चातून हा रस्ता तयार करण्याचा संकल्प केला आणि एका दिवसात अनेक वर्षांचा मार्ग आता सुकर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कसे असते सत्यशोधक पद्धतीचे लग्न? : सामाजिक क्रांतीत अग्रणी भूमिका असणारे महात्मा जोतिबा फुले यांनी जातिव्यवस्थेवर मोठा घाला घातला. भटजीच्या साक्षीने होणाऱ्या विवाहालाच मान्यता असणाऱ्या प्रतिगामी परंपरेला फाटा देत त्यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीसमोर आणली. यात कुठलेही कर्मकांड करण्याची गरज नाही. यात सृष्टी निर्मात्याला साक्षी धरुन आणि, वर आणि वधू यांची प्रतिज्ञा घेऊन हा सोहळा पार पडतो.
सत्यशोधक विवाहाचे मंगलाष्टक...
।। मंगलाष्टक ।।
(वर)
देवाचे नियमा प्रमाण धरूनी चाले तुझे कूळ गे ।। सत्याने अवघ्यांत श्रेष्ठ असशी, तैसेच हे त्वत्सगे ।। अज्ञान्या समद्दुष्टिनें शिकविशी, तूं ज्ञान त्या दाविशी ।। प्रीतीने वरितो तुला अजि तुझी, ऐकून किर्ती अशी शुभमंगल सावधान ।। १ ।।
(वधू)
मानीशी जरी त्वां दिलें अनुदिनीं, कर्त्या समाधानसें ।। आम्हां सर्व स्त्रियां असे बहु पिडा, हें नेणशी तुं कसें ।। स्वातंत्र्यानुभवाची ओळख आम्हां, झाली नसे मानसीं।। यासाठी अधिकार देशिल स्त्रियां, घे आण त्याची अशी ।। शुभमंगल सावधान ।। २ ।।
(वर)
स्थापाया अधिकार मी झटतसें, या बायकांचे सदा ।। खर्चाया मनि भी न मी किमपिही, सर्वस्व माझें कदा ।। मानीतों सकला स्त्रियांस बहिणी तू एकली मत्प्रिया ।। कर्त्याचे भय मी मनात तुजला, ठेवीन पोसावया ।। शुभमंगल सावधान ।। ३ ।।
(वधू)
बंधूत्व मजला समस्त असती, त्वद्भिन्न जे की नर ।। अज्ञाभंग तुझा करीन न कदां, मी सत्य कर्त्यावर ।। ठेवोनी अवघाचि भार झटुया, लोका कराया हिता।। हाताला धरूनी तुला वरितसे, सर्वांपुढे मी अतां ।। शुभमंगल सावधान ।। ४ ।।
(सामूहिक)
आभारा बहु मानिजे आपुलिया, माता-पित्यांचे सदा ।। मित्रांचे तुमच्या तसेच असती, जे इष्ट त्यांचे वदा ।। वृध्दा पंगु सहाय द्या मुलिमुलां, विद्या तया शिकवा ।। हर्षे वृष्टि करा फुलांचि अवघे, टाळी अता वाजवा ।। शुभमंगल सावधान ।। ५ ।।
मातृ-ऋण, पितृ-ऋण, मोचनार्थ सावधान । मानवसेवा, देशसेवा साधनार्थ सावधान । आत्मशांती, विश्वशांती वर्धनार्थ सावधान । सावधान । सावधान । सावधान ।
वर प्रतिज्ञा
आमच्या विवाहाप्रसंगी उपस्थित झालेल्या सर्व सन्माननिय समाज बांधवांना साक्षी ठेवून मी वय वर्ष वय वर्ष रा. -रा. हिला माझी पत्नी व जीवनसाथी म्हणून स्वीकारतो, व त्यासाठी मी स्वतः सुबुध्दिने प्रतिज्ञा घेत आहे.
१) मी मन, वाणी व आचरणाने आपल्या पत्नीचा नेहमी सन्मान करीन व इतरांकडून तीला सन्मान मिळवून देईन, मी आपल्या पत्नीचा कधीही अपमान करणार नाही व इतरांकडून तिला अपमानित होवू देणार नाही.
२) मी काम, क्रोध, द्वेष, गुलामी वृत्ती, मादक द्रव्याचे सेवन व दुर्व्यसनापासून अलीप्त राहीन.
३) मी मन वाणी व आचरणाने माझ्या पत्नीला समानतेचा अधिकार देईन व महत्वाचे निर्णय घेतांना तिची सहमती घेईन.
४) मी माझ्यापत्नी शिवाय इतर कोणत्याही स्त्रीशी कधीही वासनात्मक विचार व व्यवहार करणार नाही. तिच्या आचारविचारा बाबत माझ्या मनात संशयाची भावना निर्माण होवू देणार नाही. गुणदोषामुळे दुःखी न होता मी माझ्या पत्नीशी प्रेम, विश्वास, मैत्री व निष्ठापूर्वक वर्तन करीन व तीला जीवनभर साथ देईन.
५) मी कौटूंबिक जबाबदारी कुशलतेने पार पाडीन, योग्य मार्गाने संपत्ती मिळवीन व संपत्तीचे रक्षण करीन. तसेच अर्जित उत्पन्नातून सुखशांती, प्रगती, व सुरक्षेची व्यवस्था करून मी माझ्या पत्नीला व कुटूंबजनांना मन, वाणी व आचरणाने सदा सुखी, समृद्ध व प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करीन. मी प्रतिज्ञा घेतो की आजपासून जीवनभर मन, वाणी व आचरणाने या सर्व प्रतिज्ञांचे जबाबदारीने व सत्यनिष्ठेने पालन करीन व परस्परांच्या उन्नतीसाठी व राष्ट्रसेवेसाठी जीवनभर प्रयत्नशील राहीन.
वधू प्रतिज्ञा
आमच्या विवाहाप्रसंगी उपस्थित झालेल्या सर्व सन्माननिय समाज बांधवांना साक्षी ठेवून मी रा. वय वर्ष वय वर्ष - रा. यांना माझे पती व जीवनसाथी म्हणून स्वीकारतो, व त्यासाठी मी स्वतः सुबुध्दिने प्रतिज्ञा घेत आहे.
१) मी मन, वाणी व आचरणाने आपल्या पतीचा नेहमी सन्मान करीन व इतरांकडून त्यांना सन्मान मिळवून देईन, मी आपल्या पतीचा कधीही अपमान करणार नाही व इतरांकडून त्यांना अपमानित होवू देणार नाही.
२) मी काम, क्रोध, द्वेष, गुलामी वृत्ती, मादक द्रव्याचे सेवन व दुर्व्यसनापासून अलीप्त राहीन.
३) मी मन वाणी व आचरणाने माझ्या पतीला समानतेचा अधिकार देईन. महत्वाचे निर्णय घेतांना त्यांची सहमती घेईन.
४) मी माझ्या पतीशिवाय इतर कोणत्याही पुरुषाशी कधीही वासनात्मक विचार व व्यवहार करणार नाही. त्यांच्या आचारविचारा बाबत माझ्या मनात संशयाची भावना निर्माण होवू देणार नाही. गुणदोषामुळे दुःखी न होता मी माझ्या पतीशी प्रेम, विश्वास, मैत्री व निष्ठापूर्वक वर्तन करीन व त्यांना जीवनभर साथ देईन.
५) मी कौटूंबिक जबाबदारी कुशलतेने पार पाडीन, योग्य मार्गाने संपत्ती मिळवीन व संपत्तीचे रक्षण करीन. तसेच अर्जित उत्पन्नातून सुखशांती, प्रगती, व सुरक्षेची व्यवस्था करून मी माझ्या पतीला व कुटूंबजनांना मन, वाणी व आचरणाने सदा सुखी, समृध्द व प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करीन. मी प्रतिज्ञा घेते की, आजपासून जीवनभर मन, वाणी व आचरणाने या सर्व प्रतिज्ञांचे जबाबदारीने व सत्यनिष्ठेने पालन करीन व परस्परांच्या उन्नतीसाठी व राष्ट्रसेवेसाठी जीवनभर प्रयत्नशील राहीन.
हेही वाचा...