स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published : June 11, 2025 at 6:32 PM IST
|Updated : June 11, 2025 at 6:48 PM IST
अकोला : बच्चू कडू यांनी शेतकरी दिव्यांगांच्या विविध मागन्यांकरता अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. हे आंदोलन सोडवण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संपर्क करणार आहेत. तसंच संजय राठोड यांच्या खात्यात अनियमितता असल्याबद्दल जर कुणी पुरावा दिला आणि त्यात तथ्य असल्यास नक्कीच कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
निवडणुका महायुती एकत्रच लढणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोला येथे विविध विकास कामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी फडणवीस म्हणाले की, मुंबई लोकल संदर्भात केंद्रात बैठक आहे. या बैठकीत नक्की चांगले निर्णय होतील. ज्यादिवशी अपघात झाला, त्यादिवशी माझं आणि रेल्वे मंत्री यांचं बोलणं झालं आहे. लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतही होऊ शकते."
ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगले : नितेश राणे यांच्यावर बोलताना त्यांनी म्हटलं हा विषय संपला आहे. त्यावर आता काही बोलण्यात अर्थ नाही. बच्चू कडू यांना दमदाटी केली जात नाही. पालकमंत्री बावनकुळे यांच्या नावाने कोणी असं करत असेल तर चौकशी केली जाईल. परंतु, पालकमंत्री बावनकुळे असं कधीच करू शकत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलं आहे. परंतु, त्यांच्यामध्ये 'बेगानी शादी में अब्दुला दिवाना' मला व्हायचं नाही, असा टोला त्यांनी लगावला. मराठा आरक्षणासंदर्भात आमचा कायदा वैध राहील. महायुतीतील आणि पक्षांतर्गत मतभेद संवादाने सोडवू असंही ते म्हणाले.
जनतेने विकासासाठी सत्ता दिली : अकोल्यातील भूमिगत गटार योजनेसाठी लागणारा महापालिकेचा 30 टक्के भाग राज्य सरकार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच जनतेनी आम्हाला खुर्च्या तोडण्यासाठी सत्ता दिलेली नाही, तर विकासासाठी दिलेला आहे. आमचा भविष्यात ऑनलाइन कामावर भर राहणार आहे. वर्षाच्या अखेर पर्यंत आम्हाला सर्व ऑनलाइन करायचं आहे. तसंच विदर्भाचा बॅकलॉग 2027 पर्यंत संपणार, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- "विकसित भारताचा अमृत काळ, सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचला मोदी सरकारच्या कामांचा पाढा
- अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय? 'ईटीव्ही भारत'चा थेट सवाल, मुख्यमंत्र्यांनी पॅाझ घेतला अन्....
- "...जर अडचण आली तर पवार साहेबांचा सल्ला घेऊ"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

