पुणे: सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वरील हडपसर ते यवत दरम्यान वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच या भागात रस्ता रुंदीकरणासाठी जागेची अडचण होती. ही बाब लक्षात घेऊन सहापदरी उन्नत मार्ग (उड्डाणपूल) उभारणी आणि रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे ५२६२.३६ कोटी रुपयांचा प्रकल्प राज्य सरकारने मंजूर केल्याची माहिती, आमदार राहुल कुल यांनी दिली.
पुण्यात वाहतूक कोंडी : पुणे शहर आणि परिसरात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. वाहतूक कोंडीमुळं परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. तसेच या मार्गावरून प्रवास करणारे वाहन चालकांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळं वाहने अडकून पडतात. यामुळं नोकरदार, विद्यार्थी यांना वेळेत पोहचणे शक्य होत नाही. तर अनेकदा पेशंट असणाऱ्या रुग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीमुळं अडकून पडतात. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देखील हेच चित्र पुणे शहराकडील भागात दिसतं. याबाबत आमदार राहुल कुल यांनी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले होते.
नितीन गडकरी यांनी घेतली दखल : या प्रकल्पासाठी आमदार राहुल कूल यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडं सातत्यानं मागणी केली होती. तसेच, या प्रकल्पासाठी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही आमदार कुल यांनी पाठपुरावा केला होता. गडकरी यांनी देखील या प्रकल्पाची सखोल दखल घेतली आणि सविस्तर डीपीआर तयार करण्याचा सूचना दिल्या होत्या. ज्यामुळं प्रकल्पाची अंमलबजावणी शक्य झाली आहे.
"हडपसर ते यवत या महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मी सातत्यानं राज्य आणि केंद्र सरकारकडं मागणी केली. आज या प्रयत्नांना यश मिळालं असून, या प्रकल्पामुळं पूर्व पुणे, हवेली आणि दौंड तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल, वाहतूक सुरळीत होईल आणि भागाचा सर्वांगीण विकास होईल. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि नितीन गडकरी यांचे मनःपूर्वक आभार मानतो". - राहुल कूल, आमदार
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विकासाला चालना मिळेल : हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर वाहतूक सुरळीत होतील. वाहतूक कोंडीमुळं होणारे अपघात कमी होण्यास मदत होईल. वाहतूक कोंडी कमी झाल्यास वेगाने दळणवळण सुविधा उपलब्ध होईल. यामुळं स्थानिक विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -