मुंबई : राज्य शिक्षण आराखड्यानुसार राज्य सरकारने तृतीय भाषा म्हणून इयत्ता 1 ली ते 4 थी साठी हिंदी भाषा अनिवार्य असणार आहे असा शासन निर्णय काढला होता. यानंतर राज्यभरात विविध स्तरावरून या शासन निर्णयावर टीका होऊ लागली. या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट विरोध दर्शवत महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला होता. सर्व स्तरातून सतत होत असलेल्या टीकेनंतर हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असे स्पष्ट केले असून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच याबाबतची घोषणा आज केली आहे.
राज ठाकरेंचा सरकारला टोला : या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी सोशल माध्यमांवर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले. ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी, "महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली ! यासाठी तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन. सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती," असा टोला सरकारला लगावला आहे.
महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केलं : "ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केलं पण ते करताना कधी दुसऱ्या प्रांतावर मराठी लादली नाही, त्या प्रांतावर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती कसली लादत होतात? यातून नक्की काय साध्य करायचं होतं? असा प्रश्न त्यांनी केला. असो, ही सक्ती मागे घेतली हे उत्तम झालं. पण या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सगळ्या विचारधारांचे लोकं उभे राहिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन. मराठी माणूस जर असाच भाषेसाठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात कुरघोड्या करणारांच्या विरोधात असाच उभा राहिला तर काय बिशाद आहे कोणाची मराठी माणसाला गृहीत धरण्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कायम मराठी माणूस आणि भाषेसाठी उभी राहिली आहे. यावेळेस दाखवलेली एकजूट कायम दिसू दे. सरकरने हा निर्णय मागे घेतला, त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण आलं. पण ठीक आहे निर्णय घेतला यासाठी सरकारला धन्यवाद. पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार," अशा शब्दात राज ठाकरे यांनी इशारा देखील दिला आहे
हेही वाचा :