'वेव्हज'मध्ये विविध सामंजस्य करार, राज्यात ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार!
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महत्त्वाचे करार केले आहेत.


Published : May 2, 2025 at 6:05 PM IST
|Updated : May 2, 2025 at 7:25 PM IST
मुंबई : मुंबईतील बीकेसीमध्ये जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं (वेव्हज) आयोजन करण्यात आलंय. चार दिवस ही परिषद चालणार असून आजचा दुसरा दिवस आहे. या परिषदेला देश-विदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर आले आहेत. या ठिकाणी टेक्नॉलॉजी, क्रिएटिव्हिटी, कंटेंट रायटर, संगीत, चित्रपट आदी क्षेत्राबद्दल चार दिवस विविध कार्यक्रम चालणार आहेत. तसंच परदेशातील गुंतवणूकही भारतात केली जाणार आहे. दरम्यान, या परिषदेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महत्त्वाचे करार केले आहेत.
गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "आज ४३ कंपनीसोबत एक इंडेक्स आम्ही केला आहे. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहोत. ही या परिषदेतील मोठी गोष्ट आहे. आपण दोन युनिव्हर्सिटीसोबत करार केला आहे. तसंच फॉरेन युनिव्हर्सिटी आपण नवी मुंबई आणणार आहोत. त्यामुळं आता देशातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची गरज नाही. तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण नवी मुंबईत आणि देशातच मिळेल. याठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधी आले आहेत. त्यामुळं परिषदेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. तसंच वेव्हजच्या पहिल्या परिषदेचा महाराष्ट्राला बहुमान मिळाला. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एआयच्या माध्यमातून स्टुडिओ करण्यात येणार : "दोन युनिव्हर्सिटीसोबत करार केलेले आहेत. यात युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, युनिव्हर्सिटी ऑफ युके आणि मीडिया अँड इंटरटेमेंटसाठी प्राईम फोकस यासाठीही करार केला आहे. या तिन्ही कराराच्या माध्यमातून ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळं अनेक लोकांना येथे रोजगार उपलब्ध होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एआयच्या माध्यमातून स्टुडिओ करण्यात येणार आहे. तसंच गोदरेजच्या माध्यमातून एक फिल्मसिटी ही पनवेलला करणार आहोत. फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी असणार आहे. शूटिंगपासून प्रोडक्शनपर्यंत संपूर्ण काही त्याच्यामध्ये साधनसामुग्री आणि अन्य गोष्टी उपलब्ध असतील. मी कालपासून अनेक लोकांशी बोलतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय. या प्लॅटफॉर्मची गरज आपल्याला देशात होती. आपल्याकडे सगळ्यात जास्त टॅलेंटचा भरणा आहे. त्याला आता अशा परिषदेमुळे वाव मिळेल. त्यांच्या सृजनशीलतेला आणि गुणवत्तेला एक व्यासपीठ मिळेल," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा :

