छत्रपती संभाजीनगर : "औरंगजेब यानं नागरिकांवर प्रचंड अन्याय अत्याचार केले. त्यांचा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही काही लोक त्याला नायक मानतात. या लोकांनी पंडित नेहरू यांचं पुस्तक वाचावं, म्हणजे औरंगजेब किती क्रूर राजा होता, याची प्रचिती येईल," असा हल्लाबोल केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. राजनाथ सिंह यांच्याहस्ते महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं कॅनॉट परिसरात अनावरण करण्यात आलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय शिरसाट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह खासदार आणि आमदारांची उपस्थिती होती.

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण : "मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणारे महाराणा प्रताप हे इतिहासातील अद्वितीय योद्धे होते. त्यांच्या पुतळ्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत अनावरण करताना मला अभिमान वाटतो," अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराणा प्रताप यांच्या कार्याला मानवंदना दिली. महाराणा प्रताप यांच्या 16 फुटी अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरातील कॅनॉट गार्डन इथं त्यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या कार्यात साम्य असल्याचं नमूद करत राजनाथ सिंह म्हणाले, "या महापुरुषांनी केवळ शौर्यानं लढा दिला नाही, तर समाजाला एकत्र आणून राष्ट्रहिताचं कार्य केलं. त्यांची सेना सर्व समाज घटकांतील होती. ज्यामध्ये आदिवासी, मुस्लीम, इतर समाजांचे प्रतिनिधित्व होते. त्यामुळेच हे नेते केवळ युद्धनायक नव्हते, तर एकात्मतेचं प्रतीक होते," असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
चुकीचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न : "आपल्याला इतिहासाच्या नावाखाली अर्धसत्य शिकवण्यात आल्याची टीका करत त्यांनी केली. आपल्याला महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांचा संपूर्ण आणि खरा इतिहास शिकवण्यात आला नाही. स्वातंत्र्यानंतर या राजांचा चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला गेला. तर त्याऐवजी औरंगजेबासारख्या अत्याचारी राजाचा गौरव करण्याचा प्रयत्न झाला. काही लोक आजही त्याला नायक म्हणून मांडत आहेत, जे दुर्दैवी आहे. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं पुस्तक वाचा, अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. धर्मपरिवर्तन करणारा, हिंदू संस्थांना नष्ट करणारा, सनातन विरोध करणारा राजा नायक कसा असू शकतो? असं त्यात सांगितलं. आम्ही केवळ औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर केलं, यात चूक काहीच नाही," असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
आम्ही राजांचं अनुकरण करतो : आपली सनातन संस्कृती सर्वसमावेशक असल्याचं सांगत राजनाथ सिंह म्हणाले की, "आम्ही कधीच जातीचं राजकारण केलं नाही. आमचे नायक कोणत्याही एका धर्माचे नव्हते. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्याकडून आम्ही हेच शिकलो, सर्वांना सोबत घेऊन चालायचं. अशा महापुरुषांनी दिलेल्या प्रेरणेला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच आपली खरी जबाबदारी आहे," असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.
महाराणा प्रताप ऊर्जा स्तोत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आला. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचं अनावरण केलं, याचा आनंद आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडं वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा आहे. त्यामुळे प्रेरणेची कमतरता या ठिकाणी असणार नाही. महाराणा प्रतापसिंह एक राष्ट्रभक्त, देशभक्त होते, ते शेवटपर्यंत देशासाठी लढत राहिले. स्वराज्यासाठी महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं, पण मोगलांचं कधीही मांडलिकत्व स्वीकारलं नाही. आज आपण खऱ्या अर्थानं या वीर पुरूषांमुळेच स्वातंत्र्य उपभोगत आहोत. या ठिकाणी असलेला महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा केवळ पुतळा नाही, तर एक प्रेरणास्त्रोत आहे. या वीर पुरूषांच्या प्रेरणास्त्रोताच्या माध्यमातूनच स्वतंत्र भारताला विकसित भारताकडं नेण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केला जात आहे," असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा :