मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची (IPL) झगमग आणि लोकप्रियता दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील सर्व माध्यमांच्या मथळ्यांवर राज्य करतेय. आयपीएलमुळं कोट्यवधींचा व्यवसाय होतोय. तसंच आयपीएलमुळं नवोदित तरुण क्रिकेटपटू एकदम स्टार बनतायेत. मात्र, आयपीएलसह प्रसिद्धी आणि संपत्तीच्या या झगमगटापासून दूर काही खेळाडूंचा एक शांत अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. जिथं दिव्यांग क्रिकेटपटू दररोज आपली ओळख, मूलभूत सुविधा आणि पाठिंब्यासाठी झगडत आहेत. अलीकडेच, आयपीएल सामन्यादरम्यान ऑटो रिक्षाचालकाचा मुलगा विघ्नेश पुथुर हा मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळताना दिसला. त्यानं चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात तीन महत्वाचे बळी घेतल्यानंतर तो चर्चेत आला. त्याची कहाणी प्रेरणादायी आहे. संघर्ष, चिकाटी आणि संधीचे रूपांतर विजयात कसं करायचं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे विघ्नेश. आयपीएल आणि मुंबई इंडियन्सनं विघ्नेशला एक मंच दिला आणि त्यानं त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. पण, बऱ्याच दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी असा मंच अजूनही मागील काही वर्षांपासून एक स्वप्नवतच आहे.
क्रिकेट प्रशासनाची इच्छाशक्ती दिसत नाही : मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार राहुल रमुगडे यांनी सांगितलं की, "आमच्या सदाशिव शिंदे यांचं उदाहरण घ्या. अपघातात एक पाय गमावल्यावरही ते अजूनही ऑटो रिक्षा चालवतात. कारण त्यांचं घर चालवायचं आहे. अपंग असूनही ते आपल्या संसाराचा गाडा हाकतात आणि आपली आवड देखील जोपासत आहेत. ते मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाचे खेळाडूही आहेत. त्यांच्यात प्रतिभा आणि आवड असूनही, सदाशिव यांना कधीच त्यांच्या सामान्य सहकाऱ्यांप्रमाणे पाठिंबा किंवा प्रसिद्धी मिळाली नाही." पुढं बोलताना राहुल रमुगडे सांगतात की, "आमच्या व्हीलचेअर क्रिकेटमधील आणखी एक नाव म्हणजे अशोक गजमल. पोलिओग्रस्त यष्टीरक्षक आणि फलंदाज. ते स्वतःचं छोटसं चप्पलांचं दुकान चालवतात. त्यांचं सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे वानखेडे स्टेडियमवर खेळणं. पण म्हणतात ना काही स्वप्न ही स्वप्नच राहतात. त्यातलाच हा प्रकार आहे. आमच्या अशोककडं कौशल्य आहे, जिद्द आहे, पण संधी नाही. मुंबई आणि भारतातील क्रिकेट प्रशासनाकडे सुविधा आहेत. निधी आहे आणि संविधानिक तरतुदीही आहेत. ज्यांच्या आधारे दिव्यांग क्रिकेटला चालना दिली जाऊ शकते. पण आपल्याकडील क्रिकेट प्रशासनाची तशी इच्छा शक्ती दिसत नाही."
व्हीलचेअर क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा : मुंबईतील खेळाडूंनी व्हीलचेअर क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपला ठसा उमटवला असून, डिसेंबर २०१७ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भारत, नेपाळ आणि बांगलादेश या तिरंगी लढतीत तिसरा क्रमांक मिळवला होता. काठमांडू येथे हे सामने झाले होते. एप्रिल २०१८ मध्ये मुंबईत भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात संघाला हार पत्करावी लागली होती. तर, एप्रिल २०१८ मध्ये रुद्रपूर, उत्तराखंड येथे झालेल्या भारत, नेपाळ आणि बांगलादेश तिरंगी मालिकेत उपविजेतेपद मिळालं होतं. सप्टेंबर २०१८ मध्ये अजमान यूएई येथे भारत विरुद्ध पाकिस्तान मालिका आपल्या संघानं जिंकली. मार्च २०१९ मध्ये झालेली भारत विरुद्ध बांगलादेश मालिका देखील आपल्या संघानं जिंकली. तसंच २०१९ मध्ये नेपाळच्या काठमांडूमध्ये झालेला एशिया व्हीलचेअर क्रिकेट कप सामन्यात आपल्या संघानं उपविजेतेपद पटकावलं आहे. तर, जून २०२४ मध्ये उत्तर प्रदेशातील नोएडा येथे भारत विरुद्ध श्रीलंका द्विपक्षीय मालिका आपल्या संघानं जिंकली आहे.
इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीचाच अभाव : दरम्यान, "क्रिकेट प्रशासनाकडे संपूर्ण देशभरातील दिव्यांग क्रिकेटपटूंच्या आयुष्यात बदल घडवण्याची मोठी संधी आहे. पण इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीचाच अभाव आहे." असं राहुल रमुगडे सांगतात. राहुल रमुगडे स्वतः पोलिओमुळे दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. याशिवाय स्कोलियोसिस हा आजार देखील आहे. तरीसुद्धा ते आपल्या संघाचं नेतृत्व जिद्दीनं करतात. जेव्हा आपली आवड पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत एकत्र येतात, तेव्हा काय घडतं हे राहुल रमुगडे यांचा संघर्ष पाहून लक्षात येतं. राहुल रमुगडे यांनी आपल्यासारख्याच दिव्यांग मात्र क्रिकेटची आवड असणाऱ्या सहकाऱ्यांना एकत्र करून स्वतःची टीम तयार केलीय. मात्र, त्यांना अजूनही अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आर्थिक पाठबळ नाही. अपुऱ्या सुविधा यामुळे त्यांचा संघर्ष हा सुरूच आहे. अनेक सामने खेळूनही आणि ते जिंकूनही केवळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळं हे सर्व साहसी खेळाडू प्रसिद्धी पासून देखील कोसो दूर आहेत.
क्रिकेटबाबतचं व्हिजन अधिक विस्तृत करण्याची वेळ आलीय : क्रिकेट विश्वात संघर्षात यश मिळवणाऱ्या खेळाडूंच्या कहाण्या खूप लोकप्रिय आहेत. पण अशा कहाण्या फक्त आयपीएल किंवा मुख्य प्रवाहातील खेळाडूंपुरत्याच मर्यादित असू नयेत. कारण सदाशिव, अशोक आणि राहुल यांच्यासारखे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. ज्यांचे कष्ट आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास तितकाच गौरव करण्यासारखा आहे. राहुल रमुगडे सांगतात की, "आता क्रिकेट बोर्ड, आयपीएल सामन्यांना स्पॉन्सर करणाऱ्या संस्था आणि सामान्य क्रिकेट जनतेनं देखील आपलं क्रिकेटबाबतचं व्हिजन अधिक विस्तृत करण्याची वेळ आलीय. संघ विजय झाल्यावर फक्त विजय असो म्हणून चालणार नाही. त्यासाठी क्रिकेटच्या प्रत्येक प्रकाराला कोणताही दुजाभाव न करता सारखंच पाठबळ देणं देखील तितकच महत्त्वाचं आहे. शेवटी, क्रिकेट म्हणजे फक्त धावा आणि विकेट्स नाही. तर, ती आहे जिद्द, हार मानू न देणारी इच्छाशक्ती आणि ही मूल्यं भारतातील दिव्यांग क्रिकेटपटूंपेक्षा चांगल्या प्रकारे कोणीही दाखवू शकत नाही."
हेही वाचा :