अकोले (अहिल्यानगर): अकोले तालुक्यातील राजूर गावात कावीळ आजाराने (Jaundice) थैमान घातलं असून गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. गावातील दूषित पाणी पुरवठ्यामुळं काविळीचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलंय. या साथीमुळं १०० पेक्षा जास्त लोक बाधित झाले असून सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान उपचार सुरू असलेल्या २२ वर्षीय प्रियंका हरिभाऊ शेंडेचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गावात राबवली विशेष मोहीम: राजूर गावातील कावीळ रुग्णांच्या वाढत्या संख्येची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी राजूरला भेट दिली. गावातील पाणी स्वच्छतेत झालेल्या त्रुटीमुळं काविळीचा प्रादुर्भाव झाल्याचं त्यांच्या पाहणीत आढळून आलं आहे. त्यामुळं तत्काळ पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. नारायण वायफासे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी आणि जनजागृती सुरू केली आहे. गावातील वाड्यावस्त्यांवर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
गावाचा पाणीपुरवठा थांबवला : राजूरमधील सर्व खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहे. गावाचा पाणीपुरवठा तातडीनं थांबवण्यात आला असून, शुद्धीकरण चाचणी झाल्यानंतरच तो पुन्हा सुरू केला जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेटे यांनी दिली. साथीचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आजचा आठवडा बाजार प्रशासनानं बंद ठेवला आहे. त्यामुळं गावातील बाजारपेठही ओस पडल्या आहेत.
कावीळ आजारानं केला कहर : गावातील पाणी स्वच्छतेचा प्रश्न नवा नाही. वेळोवेळी याकडं लक्ष वेधलं गेलं होतं. मात्र, उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळं आज कावीळा आजाराने गावावर कहर केलाय. आता तरी प्रशासनानं गांभीर्याने पावले उचलावी, अशी अपेक्षा माजी सरपंच बाळासाहेब देशमुख यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा -