मुंबई- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता मुंबईकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कारण मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव आणि पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिलीय. त्यामुळं आगामी काळात मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट आणि पाणी प्रश्न टळणार आहे. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर, वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.
धरणाच्या कामास गती द्यावी...: दरम्यान पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाच्या परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करण्यात यावी. या व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी शेतकऱ्यांच्या स्वइच्छेने संपादित करण्यात याव्यात, याबाबत तसा निर्णयही यावेळी घेण्यात आलाय. दरम्यान, गारगाई प्रकल्पासाठी 844.879 हेक्टर जमीन वळतीकरण प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळं मुंबईतील वाढत्या लोकसंख्येसाठी गारगाई प्रकल्प महत्त्वाचा असून, मुंबईकरांसाठी अतिरिक्त पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. दुसरीकडे गारगाई धरणाचे 100 टक्के काम पूर्ण करण्यासाठी वन विभागाने वन्यजीव आणि पर्यावरण विषयक परवाने अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून द्याव्यात आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे त्रुटीविरहीत प्रस्ताव सादर करावा. तथा तातडीने वन्यजीव आणि पर्यावरण विषयक मंजुरी घ्याव्यात, जेणेकरून गारगाई धरणाच्या कामास गती येईल आणि काम पूर्णत्वास जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
धरण वाड्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर बांधण्यात येणार : गारगाई धरण हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे तानसा अभयारण्य आणि जव्हार वन विभागाचे मिळून 844 हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार आहे. तसेच 3 लाख 10 हजार झाडांची कत्तल होणार आहे. गारगाई धरण प्रकल्पात 6 गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 1 हजार 820 कोटी रुपये असून, त्यामधील 2 टक्के रक्कम (35 कोटी रुपये) भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.
व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करण्यात येणार : दुसरीकडे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या वन जमिनीच्या ऐवजी व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारील व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी संपादित करण्यात यावी, तसेच वनीकरणासाठी घेण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकारच्या परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करण्यात येईल. या व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी सहमतीने संपादित कराव्यात. तसेच संरक्षित क्षेत्र आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्प, राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने शिफारस केलेले प्रस्तावावर बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आलीय.
हेही वाचा :