कोल्हापूर - कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांनी मुलगा अंबरीश घाटगेंसोबत नुकताच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच घाटगे यांनी विरोध दर्शवला होता. आता भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरही या महामार्गाला विरोध असेल. मी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडणार असल्याचं संजय घाटगे म्हणाले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वर्धा ते गोवा शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही धगधगत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्ग रद्द करू असं आश्वासन दिलं होतं. राज्यातील आताचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर महामार्ग रद्द झाल्याचा शासन निर्णय शेतकऱ्यांना दाखवला होता. मात्र राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गातबाबत अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटितपणे महामार्गाला विरोध दर्शवला असून कोल्हापूर जिल्ह्यात विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, कागलचे माजी आमदार संजय घाटगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर भूमिका घेत महामार्ग होऊ देणार नाही असं यापूर्वी जाहीर केलं आहे. तर महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांनी भूमिका बदलत महामार्गाच्या बाजूने असल्याचं सांगितलं आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना साथ दिलेले माजी आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक संजय घाटगे यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना घाटगे यांनी कागल तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम असल्याचं सांगितलं.
शक्तीपीठ विरोधात लढा उभारणाऱ्या शिक्षकाचे निलंबन मागे घ्या - शक्तीपीठ विरोधातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोट बांधून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केलेल्या गिरीश फोंडे यांचं कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतून सहाय्यक शिक्षक पदावरून निलंबन केलं आहे. हे निलंबन मागे घ्यावं यासाठी आज इंडिया आघाडी, शक्तिपीठ महामार्ग विरोधी महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला. मोर्चाद्वारे गिरीश फोंडे यांचं निलंबन तत्काळ मागे घ्यावं, अन्यथा काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा शिक्षकांनी दिला. यामुळे आता शक्तिपीठ महामार्गावरुन कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे.
हेही वाचा...