कोल्हापूर : लाखांचा पोशिंदा शेतकरी शिवारात येणाऱ्या पिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणं जपतो. मात्र, याच पिकांवर जेव्हा एखादा रोग पडतो तेव्हा, बळीराजाचं न भरून निघणारं नुकसान होतं. हेच नुकसान टाळण्यासाठी आता कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठानं महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. कृत्रिम बुद्धिमत्तेवर अर्थात 'एआय'वर आधारित या संशोधनातून शेतात असलेल्या पिकांवर कोणता रोग पडलाय? हे क्षणात समजणार आहे. त्यामुळं बांधावरच पिकांवर पडलेल्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्याला मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाला भारतीय पेटंट कार्यालयाकडून नुकतंच पेटंट प्राप्त झालं आहे. कसं करतं हे तंत्रज्ञान काम? शेतकऱयांना कसा होणार फायदा? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत' कोल्हापूरचे प्रतिनिधी महेश कांबळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट...
'एआय'च्या माध्यमातून मिळणार रोगाची माहिती : सध्या जगभरात 'एआय'चा बोलबाला आहे. प्रत्येक क्षेत्रात 'एआय'चा वापर वाढलाय. याचे काही प्रमाणात तोटे जरी असले तरी अनेक फायदे देखील आहेत. डिजीटल युग असताना आपला बळीराजा तरी यात कशाला मागे पडेल ना! आता याच 'एआय'चा वापर करून पिकांवर कोणता रोग पडलाय याची माहिती शेतकऱयांना लगेच मिळणार आहे. यापूर्वी, रोगाचा सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवायचे व त्यानंतर काही दिवसात त्या रोगाबद्दल माहिती शेतकऱयांना मिळायची. तोपर्यंत पिकांवरील रोग वाढत जात व त्याचा शेतकऱयांना मोठा तोटा सहन करावा लागायचा. आता 'एआय'मुळं नुकसानंही कमी होणार व वेळ देखील वाचणार आहे. याआधी 'एआय'च्या माध्यमातून ऊसाची शेती केल्याचा प्रयोग आपण बारामतीमध्ये बघितला होता. आता या नवीन संशोधनामुळं शेतकऱयांना नक्की फायदा होईल, अशी माहिती शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी दिली.
यापूर्वी रोग समजण्यासाठी लागायचे दोन ते तीन दिवस : "राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक एस. टी. टिळक आणि आर. एल. कुलकर्णी यांनी 1972 मध्ये विकसित केलेल्या 'टिळक सॅम्पलर'च्या आधारानं शेतातील पिकाचं सॅम्पल घेऊन ती प्रयोगशाळेत पाठवण्यात यायची. हवामान आणि विषाणू यांचा अभ्यास करून पिकांवर कोणता रोग पडला आहे, हे समजण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जायचा. यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी वेळ जायचा. मात्र, आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात बसवलेल्या सॅम्पलरच्या आधारानं बांधावरच शेतकऱ्याला पिकांवर कोणता रोग पडलाय हे समजणार आहे. यामुळं शेतकऱ्याचं होणारं नुकसान टळणार आहे," अशी माहिती या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार डॉ. शिवराज थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
शिवाजी विद्यापीठाचं संशोधन शेतकऱ्यांसाठी 'वरदान' : शिवाजी विद्यापीठानं यापूर्वी असे काही संशोधन केले आहेत. मणिपूरच्या प्रसिद्ध 'ब्लॅक राईस'च्या वाणांवर संशोधन करून मूळ भाताचा रंग, सुगंध आणि चव कायम ठेऊन भाताचा उत्पादन कालावधी कमी झाल्याचं संशोधन शिवाजी विद्यापीठानं केलं आहे. तर, टाकाऊ चहापुडीवर रसायनशास्त्र विभागानं संशोधन करून चहापत्तीपासून बनवलेलं 'डॉट्स नॅनो मटेरियल' पिकांच्या उगवणीसाठी आणि पिकांना जोर धरण्यासाठी उपयुक्त ठरत आहे, यामुळं शिवाजी विद्यापीठाचं शेतीबाबत संशोधन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
कोणी केलं संशोधन? : राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक एस. टी. टिळक आणि आर. एल. कुलकर्णी यांनी 1972 मध्ये शेतातील विविध पिकांवर सापडणारे आणि हवेतून संक्रमण करणारे वेगवेगळे विषाणू शोधण्यासाठी आणि ओळखण्यासाठी 'टिळक एअर सॅम्पलर' वापरला होता. अजूनही पिकांवरील रोग समजण्यासाठी याच पद्धतीचा वापर केला जातो. मात्र, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड इथल्या डॉ. सुजित जाधव, रेठरे इथले डॉ. सुनिता जाधव, शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे सहाय्यक ग्रंथपाल आणि या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार डॉ. शिवराज थोरात, लंडन इथले क्वीन्स मेरी युनिव्हर्सिटीत एम. एस (एआय) चे शिक्षण घेत असलेले ऋतुराज जाधव आणि इस्लामपूरच्या राजाराम बापू टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी पृथ्वीराज जाधव यांनी या संदर्भातील संशोधन केलं आहे. 'एआय बेस्ड डिव्हाइस फॉर डिटेक्शन ऑफ प्लांट डिसीजेस' या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंट जाहीर करण्यात आलंय.
हेही वाचा :