पुणे : पुरंदर विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली असून शासनाच्या वतीने हालचाली सुरू झाली आहे. शेतकऱ्यांशी संवाद सुरू झाला असून भूसंपादनाच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे. पुरंदर मधील सात गावांमध्ये हे विमानतळ होणार आहे. मात्र असं असताना आत्ता या सात गावातील नागरिकांचा पुरंदर विमानतळाला विरोध होत असून आज हजारोच्या संख्येनं सात गावातील शेतकरी माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश मोर्चा काढत आले.
पुरंदर गावातील सात गावातील हजारो शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुण्यातील अल्पबचत भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश मोर्चा काढत पुरंदर विमानतळाला विरोध करण्यात आला. यावेळी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुरंदर विमानतळाला एकही जागा देणार नसून या विमानतळाला आमचा विरोध असल्याचं देखील या शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी आंदोलक शेतकरी म्हणाले की, पुरंदर तालुक्यात सात गावांवर शासन जबरदस्तीने विमानतळ लादत आहे. प्रशासनाने एकेक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे. 73 व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांना अधिकार तसंच महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यानुसार सातही गावातील ग्रामपंचायती आणि ग्रामसभा यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यास विरोध असल्याचे ठराव वेळोवेळी दिले आहेत. मात्र याचा विचार शासन करत नाही हा अन्यायच आहे. या विमानतळामुळे शेतकरी पूर्णता उध्वस्त होणार आहे आणि आमच्या प्रपंचाचा शेवट होणार आहे. आमच्या पुढील पिढ्यांचे भवितव्य संपणार आहे. आमचं घर जमीन जाणार या भीतीपोटी आम्ही प्रचंड मानसिक दबावाखाली वावरत आहोत. आमच्यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू देखील झाला असून अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून हा प्रकल्प इतरत्र हलवावा आणि ड्रोन सर्वेक्षण तसंच जमीन मोजणीचं काम त्वरित थांबवावं ही विनंती आहे. अन्यथा खूप शेतकरी विमानतळाच्या भीतीपोटी आपले जीवन संपवतील. हे होऊ नये यासाठी विमानतळ प्रकल्प रद्द करावा ही आमची विनंती आहे, असं यावेळी शेतकरी म्हणाले.

जनतेचे जीवन सुसह्य करण्याऐवजी त्यांना पीडा देणे अशा प्रकारचे शासनाचे काम सुरू आहे. त्यास वाचा फुटावी म्हणून हा आक्रोश मोर्चा काढला असून आमच्या जमिनी काढून घेऊ नका ही सरकारकडे आमची मागणी असल्याचं यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा....