छत्रपती संभाजीनगर : अहमदाबाद येथील विमान दुर्घटना अतिशय भीषण होती. या घटनेमुळे 26 एप्रिल 1993 साली शहरात झालेल्या घटनेला उजाळा मिळाला. इतिहासात पहिल्यांदाच विमान आणि ट्रकची धडक झाली. या धडकेत विमानाचे तीन तुकडे होऊन त्यात राज्यातील नामांकित उद्योजकांचा आणि प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला होता. गुजरातमधील घटना कळताच या अपघाताचा थरारक अनुभव डोळ्यासमोर उभा झाल्याची भावना माजी उद्योग मंत्री राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली.
विमान आणि ट्रकची झाली धडक : विमानाच्या होणाऱ्या दुर्घटना वाढत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यानं हे अपघात झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र विमान आणि ट्रकची धडक झाली असं म्हणलं, तर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे, 26 एप्रिल 1993 रोजी इतिहासात पहिल्यांदाच असा विचित्र अपघात घडला. दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी एअर इंडियाच्या विमानानं मुंबईच्या दिशेनं उड्डाण केलं आणि अवघ्या एक मिनिटात ते कोसळलं. "वृत्तपत्राचं कामकाज करत असताना अग्निशमन दलाच्या गाड्या जाताना दिसून आल्या, माहिती घेतल्यावर विमानाचा अपघात झाल्याचं कळलं. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली," असा अनुभव माजी मंत्री राजेंद्र बाबू दर्डा यांनी सांगितला.
असा झाला होता अपघात :"26 एप्रिल 1993 रोजी एअर इंडियाचे बोईंग 737 आयसी 497 विमान दिल्ली - जयपूर - उदयपूर - औरंगाबाद- मुंबई विमानानं दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी मुंबईकडं उड्डाण घेतलं. त्यावेळी विमानतळाची धावपट्टी लहान होती, तर जवळूनच बीड महामार्गाकडं जाण्यासाठी एक रस्ता होता. त्या रस्त्यावरून अनेक वाहनांची वर्दळ असायची. दरम्यान विमान जाताना पाहण्यासाठी अनेक जण त्याठिकाणी येत असत. त्यादिवशी एक ट्रॅक ज्यामध्ये कापसाची वाहतूक होत होती, त्याचा चालक विमान पाहण्यासाठी थांबला. विमानाचं उड्डाण झालं, मात्र त्याचं चाक ट्रकच्या मागच्या बाजूला लागून अडकलं. त्यामुळे विमानाची दिशा बदलली. समोर असलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श त्याला लागला अन् काही सेकंदात हे विमान चिकलठाणा जवळ असलेल्या हिरापूर गावातील मोकळ्या जागेवर जाऊन पडलं. पडताच त्याचे तीन तुकडे झाले आणि आग देखील लागली. या अपघातात 55 जणांचा मृत्यू झाला, त्यात 53 प्रवासी आणि दोन कर्मचारी होते. तर 63 प्रवासी बचावले होते," अशी माहिती माजी मंत्री राजेंद्र बाबू दर्डा यांनी दिली.
आपल्या ट्रकला विमान धडकलं : "सहसा विमानात तांत्रिक बिघाड होऊन अपघात होऊ शकतो, असा अनुभव आहे. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकचा आणि हवेत असणाऱ्या विमानाचा अपघात झाला हे कधीही न पटणारं आहे. सुरुवातील माहिती मिळण्यात काही गल्लत होते असं अनेकांना वाटलं. ज्या ट्रकला विमानाची धडक बसली, त्याच्या चालकानं त्यावेळी आपल्या मालकाला "आपल्या ट्रकला विमान धडकलं" असं सांगितलं. त्यावेळी तू पिलेला आहेस का? असं कसं होईल, म्हणत त्याचं मालकानं गंमतीवर घेतलं," असा अनुभव देखील राजेंद्र बाबू दर्डा यांनी सांगितला.
अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा झाला होता मृत्यू : राजेंद्र बाबू दर्डा यांनी सांगितलेल्या अनुभवानुसार, त्यावेळी त्यांच्याकडं मारुती 800 गाडी होती. घटना कळताच त्यांनी चिकलठाणा भागाकडं धाव घेतली. "रस्त्याच्या डाव्या बाजूला विमान कोसळलं असल्याचं पाहायला मिळालं. आगीचे लोळ निघत होते, बाहेरील बाजूस अनेक जण होरपळलेले दिसून आले. विमानाचे तीन तुकडे झाले होते. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले होते. पहिल्यांदाच असा भीषण अपघात पहिला होता. मात्र त्यावेळी वृत्तपत्राची जबाबदारी असल्यानं तत्काळ फोटो काढले. त्यावेळी जळणाऱ्या विमानाचा एकमेव फोटो मला काढता आला. मात्र एकीकडं पडलेले मृतदेह, दुसरीकडं जखमींना रुग्णालयात नेतानाचे दृश्य, विमानाला लागलेली आग आजही अंगावर शहारे आणणारा आहे," असं मत राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केलं.
शरद पवार तातडीनं आले घटनास्थळी : "झालेल्या अपघातात व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख नंदलाल धूत, यांच्यासह राज्यातील नामांकित उद्योजक, व्यावसायिक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर विमानाचा अपघात होऊनही काही प्रवासी जिवंत वाचले. त्यामध्ये प्रतिष्ठित नागरिकांसह पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. अपघात होताच सुखरूप असलेल्या प्रवाशांनी बाहेर उड्या टाकल्या आणि महामार्ग गाठला. विमानाच्या मागच्या बाजूला असलेले आणि समोरच्या बाजूला असलेले काही प्रवासी मात्र दुर्दैवानं बचावले नाहीत. घटना कळताच त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार आणि उड्डाण मंत्री गुलाम नबी आझाद यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती," असा अनुभव राजेंद्र बाबू दर्डा यांनी सांगितला.
हेही वाचा :