बुलढाणा- शिंदे गटाचे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गृह विभागासह पोलीस विभागांवर अशोभनीय वक्तव्य केलं होतं, त्यानंतर याची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर काल रात्री शहर पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड यांना फोनवर एक प्रकारे समज दिलीय. त्यांनी आज माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केलीय. मात्र जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंद्यांबाबत आपण अधिवेशनामध्ये पुरावे सादर करणार असल्याबाबतही त्यांनी सांगितलंय.
एकनाथ शिंदे गायकवाडांना काय कानपिचक्या देणार?- विशेष म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाण्यात म्हणजेच संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गायकवाडांना काय कानपिचक्या देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात आमदारांनी बोलताना त्यांच्या भाषेवर संयम ठेवला नाही तर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. गायकवाड म्हणाले होते की, ही टिप्पणी त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून आलीय आणि पोलीस दलाला निराश करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता.
...तर मी दिलगिरी व्यक्त करतो : "मी ऐकलंय की, देवेंद्र फडणवीस माझ्या टीकेमुळे नाराज आहेत. मला एकनाथ शिंदे साहेबांचा फोन देखील आला होता. माझ्या वक्तव्याचा उद्देश पोलिसांना निराश करणे किंवा त्यांचा अपमान करणे नव्हता. मी फक्त माझे अनुभव सांगितले आणि जर माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र सरकार किंवा राज्य पोलिसांचा अपमान झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो," असंही संजय गायकवाड म्हणालेत.
नेमकं प्रकरण काय? : गृह खातं सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, ते एकनाथ शिंदेंशी बोलणार आहेत. "पोलिसांबद्दल अशी टिप्पणी करणे योग्य नाही. मी शिंदे साहेबांना सांगेन की त्यांनी संजय गाडकवाड यांना तंबी द्यावी. जर ते वारंवार असे बोलत असतील तर आम्ही कारवाई करू," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर शिंदे म्हणाले की, गायकवाड यांनी आता दिलगिरी व्यक्त केलीय. "काही पोलीस अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी नक्कीच केल्या पाहिजेत आणि त्यात काही हरकत नाही. पण आम्ही संपूर्ण पोलीस दलाला दोषी ठरवू शकत नाही, कारण ते शौर्याचे प्रतीक आहे, मग ते 26/11 चा दहशतवादी हल्ला असो, कोरोना साथीचा रोग असो किंवा (त्यांच्या सणांच्या काळात). ते सर्व अडचणींना तोंड देत काम करीत असतात. आम्हीच त्यांचा आदर करतो," असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केलंय.
हेही वाचाः
साताऱ्यात दुचाकी पिकअपची समोरासमोर धडक, दोन अल्पवयीन मित्र जागीच ठार
पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत पोलीस अलर्ट मोडवर, CSMT स्थानकाची सुरक्षा वाढवली!