नाशिक - बनावट जन्म दाखला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले महानगरपालिकेचे कर्मचारी अब्दुल शेख आणि गजाला अहमद यांच्या मालेगावातील घरावर ईडी आणि प्राप्तीकर विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या छापे टाकले. त्यांच्या घरातून बनावट जन्म-मृत्यू दाखले आढळून आल्याचं समजतं.
मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जन्म दाखला घोटाळा झाल्याचा दावा करत मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला होता. यानंतर शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती. त्यात कामात कसूर केल्याप्रकरणी महसूल तसंच वन विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे आणि विद्यमान नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित करण्यात आलं होतं. आतापर्यंत या प्रकरणात जवळपास 35 ते 40 संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान 25 एप्रिल रोजी सांयकाळी ईडी आणि आयकर विभागाकडून मालेगावातील संशयितांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली आहे. यात महापालिकेचे जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचारी तव्वाब शेख यांच्यासह आयेशानगर येथील गजाला परवीन यांच्या घरांवरही छापा टाकण्यात आला. या व्यतिरिक्त भगीरथ चौधरी, मोहम्मद अमीन मोहम्मद हसन, निवृत्ती बागुल आणि शंकर महाजन यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली असून त्यांच्या घरातून बनावट जन्म दाखले मिळून आल्याचं म्हटलं जातं असलं तरी अद्यापपर्यंत पथकाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मालेगाव बदनाम करण्याचं कारस्थान - विशेष पोलीस पथकाच्या चौकशीत एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी नागरिक आढळलेला नाही. त्यामुळे या चौकशीत तथ्य नाही. मालेगाव शहराला बदनाम करण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. तसंच महानगरपालिकेतील जन्म दाखला विभागातील कर्मचारी तव्वाब शेख यांच्या घरी जन्म व मृत्यू दाखले आढळले असले, तरी या दाखल्यांची नोंद कब्रस्तान या ठिकाणी ठेवावी लागते. तसंच नागरिकांना सहज दाखले उपलब्ध व्हावेत यासाठीही शेख यांनी दाखले घरी ठेवले असतील, असा दावा देखील माजी आमदार शेख यांनी केला. केवळ मालेगावला बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा....