पुणे : जगभरात कोरोना काळातील अत्यंत वाईट आठवणी आजही ताज्या आहेत. कोरोनामध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. त्यानंतर जनजीवन पूर्व पदावर यायला खूप वेळ लागला होता. त्यातच आता पुन्हा एकदा देशात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या बघता राज्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
नवीन विषाणू धोकादायक नाही : भारतात देखील कोरोनाच्या नवीन रुग्णांच्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पण सध्या आशियातील देशांमध्ये जे काही रुग्ण वाढत आहेत, त्याबाबत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे चेस्ट स्पेशालिस्ट डॉ.कपिल झिरपे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, "हा नवीन विषाणू धोकादायक नाही, त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जेवढी चर्चा त्या देशांमध्ये कोविडबाबत नाही, तेवढी आपल्या देशात होत आहे."
का वाढत आहे कोरोना? : पुढं डॉ. कपिल झिरपे म्हणाले की, "आशियातील तीन देशांमध्ये कोविडचे रुग्ण वाढत आहे. कोविड विषाणूचे नवनवीन व्हायरस हे येत राहतील, पण घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. सध्या जो नवीन विषाणू आहे तो अत्यंत विक आहे. जसं आपल्याला सर्दी, खोकला होतो तसा हा विषाणू आहे. प्रत्येक वेळेस आपण भीती बाळगत नाही तर याबाबत काळजी घेत असतो. तशीच परिस्थिती या कोविड विषाणूबाबत आहे. या देशांमध्ये जे काही रुग्ण वाढत आहेत. त्याचं कारण आहे की, ते कोविडची चाचणी करत आहेत. आपल्या इथ देखील हजारो रुग्ण असू शकतात. पण आपण जर चाचणी केली तर ते रुग्ण आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील. तसेच प्रत्येक चाचणी केलेला रुग्ण हा गंभीर नसतो. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला रुग्णालयाची गरज भासते असं नाही. हा नवीन विषाणू ओमायक्रॉनच नवीन व्हायरस असण्याची शक्यता आहे. पण याला घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही".
काय काळजी घ्यावी? : "नव्या विषाणूच्या बाबतची चर्चा ही फक्त भारतात होत असून हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड देशामध्ये याबाबत कोणतीही चर्चा नाही. कोविड हा एक व्हायरस आहे. असे अनेक व्हायरस आहेत आपल्याला याबाबतची काळजी आयुष्यभर घ्यायची आहे. जर कोणालाही सर्दी, खोकला, तास आल्यास इतरांना त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. तसेच गर्दीत जाणं टाळा आणि मास्कचा वापर करावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही त्रास झाल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूपच गरजेचं आहे. सध्या हे काही कोविडबाबत भीती व्यक्त केली जात आहे किंवा अफवा पसरवली जात आहे, त्यावर विश्वास ठेवू नका", असं आवाहन देखील यावेळी डॉ.कपिल झिरपे यांनी केलं.
हेही वाचा -