कोल्हापूर : कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (गुरुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशन, संतोष देशमुख हत्याप्रकरण, 'सौगात-ए-मोदी' कार्यक्रम, लाडकी बहीण योजना अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमच्याकडं पूर्ण बहुमत असताना देखील विधिमंडळाचं काम रेटून नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही. कोणी काय म्हणावं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.
विरोधकांकडे कोणताच मुद्दा आता राहिलेला नाही : अजित पवार म्हणाले, "अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी संविधानावर इतकी चांगली चर्चा झाली. अधिवेशनाच्या चार आठवड्यामध्ये आम्ही दररोज नऊ तास काम केलं. यामुळं अनेक लक्षवेधी प्रश्न मार्गी लागले, विरोधकांकडे कोणताच मुद्दा आता राहिलेला नाही. त्यामुळं ते वेगळे काही तरी मुद्दे काढत आहेत. काही अग्रलेख देखील लिहिले आहेत. ज्यामध्ये नुसतं विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून दहा-पंधरा मिनिटं घोषणा द्यायचं आणि सभागृहात येऊन बसायचं. प्रसारमाध्यमातून राज्याच्या जनतेला आम्ही फार काही काम करतोय, असं दाखवून द्यायचं असा केविलवाणा प्रयत्न विरोधकांनी केलाय, सभागृहात विरोधकांची उपस्थिती जास्त नव्हती, फार कमी लोक उपस्थिती रहायचे, जे कामकाज आम्ही हाती घेतलं होतं, हे व्यवस्थित पार पडलेलं आहे, आमच्याकडं पूर्ण बहुमत असताना देखील विधिमंडळाच काम रेटून नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही. तसंच कोणी काय म्हणावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे", असं अजित पवार यांनी सांगितलं.
चुकीचा वागला असेल, त्याला शासन होणार : "बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. कुठंही राजकीय हस्तक्षेप नसून उज्वल निकम यांच्यासारखे प्रख्यात वकील तिथं नेमले गेलेत, इथं कोणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही, जो चुकीचा वागला असेल जो दोषी असेल जो मास्टरमाईंड असेल, त्याला तेथे शासन होणार", असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसंच, गेली ५३ वर्ष रखडलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत अजित पवार म्हणाले की, "कोल्हापूर हद्दवाढीसंदर्भात राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केलीय. या भागातील लोकप्रतिनिधींचा देखील ऐकून घ्यावं लागत, त्या बैठकीत बऱ्याच अंशी मार्ग निघेल अशी चर्चा झालीय".
काही घटकाला शुभेच्छा देण्याकरता हा कार्यक्रम : ईद निमित्त 'सौगात-ए-मोदी' हा कार्यक्रम भाजपानं आणलाय, याबाबत अजित पवारांना विचारलं असता, ते म्हणाले, "भाजपानं 'सौगत-ए-मोदी' कार्यक्रम सुरू केलाय. चांगला काही कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटून घ्यायचं काय? सर्वधर्म समभाव हे आपल्या देशाची परंपरा आहे. त्यामुळं हा एक महत्त्वाचा घटक आहे. ज्या पद्धतीनं इतर सण असतात, त्या पद्धतीनं रमजान महिना देखील महत्त्वाचा असतो. त्यानिमित्त काही घटकाला शुभेच्छा देण्याकरता हा कार्यक्रम आणला आहे", असं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच, "छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरनं गुन्हा कबूल केला असेल तर त्याबाबतची कागदपत्रं तयार करून संबंधित व्यवस्थेसमोर मांडलं जाईल आणि दोषी असेल त्यांना शासन केलं जाईल", असं अजित पवार म्हटलंय.
लाडकी बहीण योजना सुरूच राहणार : पुढं अजित पवार यांनी सांगितलं की, " आर्थिक नियोजनात कर्नाटक सरकारची परिस्थिती आज काय झाली आहे, पाहिलं आहे का? केरळला कोर्टात जाऊन अधिकच कर्ज मागावं लागलं, मात्र आम्ही राज्याची आर्थिक स्थिती विस्कटणार नाही. राज्याच हित साधेल असा विचारपूर्वक अर्थसंकल्प सादर केलाय. राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही अर्थसंकल्पातून केलाय. निवडणुकीपूर्वी आम्ही काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातील लाडकी बहीण योजना आणि वीज कर्जमाफीची योजना चालू ठेवली जाणार आहे. आमची आर्थिक परिस्थिती बघता सर्व योजना सुरू करणार आहोत. आम्ही दिलेल्या शब्दापासून बाजूला गेलो नाही. आम्ही ५ वर्षासाठी जी आश्वासन दिली आहेत, ती पुढील ५ वर्षांत टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार आहोत", असंही अजित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा :
- पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या अनुषंगाने भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते सक्रिय; बावनकुळेंकडून सुरक्षेचा आढावा
- "वाघ्या कुत्र्यासंदर्भात समिती स्थापन करा अन् जे काही सत्य असेल...", भूषणसिंहराजे होळकरांची स्पष्ट भूमिका
- "सौगात-ए-मोदी नव्हे तर सौगात-ए-सत्ता; भाजपानं हिंदुत्व सोडलं हे जाहीर करावं", उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल