सातारा - ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का, हा त्यांच्या पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते एका परिवारातले आहेत. त्यामुळं त्यांच्या अंतर्गत प्रश्नात आपण नाक का खुपसायचं, असा उलट सवाल अजितदादांनी केला.
एकत्र यायचं का? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न : उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंमधील युतीबाबत आपली प्रतिक्रिया दिली. दोन्ही ठाकरे बंधू हे एका परिवारातले आहेत. त्यांनी काय करावं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी एकत्र यावं की नाही, हे कुठल्या राजकीय पक्षांनी सांगण्याचं कारण नाही. प्रत्येकानं आपल्या सद्सद्विवेक बुध्दीला स्मरून योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंना गावाकडं आल्यावर बरं वाटतं : एकनाथ शिंदे नाराज आहे का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, ते साफ खोटं आहे. त्यांना नवीन महाबळेश्वर वसवायचं असून शेतीतही लक्ष घातलेलं आहे. गावाकडे आल्यावर त्यांना बरं वाटतं. तीन दिवस सुट्ट्या होत्या. मंत्रालयात काम नव्हतं. गावात येऊन काही गोष्टींचा शांतपणे विचार करता येतो. त्यांच्या मनात जे काही असेल त्याच्याबद्दलची चर्चा करता येते. मी तीन दिवस गावी चाललोय, असं ते सांगूनच गावी आले असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
... तर कराड दक्षिणचा निकाल वेगळा लागला असता : काँग्रेसचे माजी मंत्री विलासकाका उंडाळकरांचे सुपूत्र ॲड. उदयसिंह पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी बोलताना अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसनं तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना कराड दक्षिणमधून उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात विलासकाका उंडाळकर अपक्ष उभे राहिले. मी त्यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे राहण्याचा आग्रह केला होता. तसं झालं असतं तर त्यावेळचा निकाल वेगळा लागला असता, असं सूचक वक्तव्य अजितदादांनी यावेळी केलं.
हेही वाचा -