मुंबई- राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राची लोककला ही राज्यातील परंपरा आणि संस्कृतीचा एक घटक मानला जाते. आजही तमाशा, लावणी, संगीत, नाटक, पोवाडा, शाहीर आदी लोककला गावखेड्यात लोकांचे मनोरंजन करतात. दरम्यान, राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्याबरोबरच त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घेतलाय. या निर्णयामुळं लोक कलावंतांना नक्कीच मदत मिळणार आहे, असं बोललं जातंय.
लोककला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न : दरम्यान, काही दिवसांपूर्वी तमाशा आणि कला केंद्रातील कलावंत, लोक कलाकार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली होती. तसेच लोककला जिवंत ठेवण्यासाठी आणि आमच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे, अशी मागणी केली होती. दरम्यान, या समित्या तमाशा आणि कलाकेंद्र क्षेत्रातील फडमालक, कलाकार, वादक यांच्यासमोरील समस्या, प्रश्न जाणून घेऊन पारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवतील आणि यासाठी सरकार पुढाकार घेईल, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिलीय. या समित्यांचा कार्यकाळ 30 दिवसांचा असणार आहे.
तमाशा तक्रार निवारण समिती कशी आहे? : तमाशा तक्रार निवारण समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक अध्यक्ष असणार आहेत. तमाशा फड मालक रघुवीर खेडकर, तमाशा फड मालक गोपाळ नाना शेषेराव, फड मालक संभाजी जाधव, कलाकार मंगलाताई बनसोडे, कलाकार अतांबर तात्या शिरढोणकर, अभ्यासक गणेश चंदनशिवे, अभ्यासक खंडुराज गायकवाड आणि सहसंचालक सदस्य म्हणून काम पाहतील.
कलाकेंद्र तक्रार निवारण समिती कशी आहे? : कलाकेंद्र तक्रार निवारण समितीमध्ये संचालक सांस्कृतिक कार्य हे अध्यक्ष असणार आहेत. कलाकेंद्र मालक बाळासाहेब काळे, कलाकेंद्र मालक अभिजित काळे, कलाकार संघटनेचे धोंडीराम जावळे, कलाकार रेश्मा परितेकर, कलाकार सुरेखा पुणेकर, कलाकार प्रमिला लोदगेकर, अभ्यासक प्रकाश खांडगे आणि सहसंचालक हे सदस्य म्हणून काम पाहतील. तर या क्षेत्रातील अन्य, अभ्यासक, कलाकार आणि कलाकेंद्र चालक यांनाही आवश्यकतेनुसार बोलावण्यात येईल, या समित्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या शिफारसीनुसार शासनाकडून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिलीय.
हेही वाचा :