गडचिरोली/नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर वसलेल्या कवंडे या गावात पोहोचले होते. कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या १२ नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शस्त्रांसह शरणागती पत्करली आहे. शस्त्रांसह शरणागती पत्करणारे अशाप्रकारची पहिलीच घटना आहे.

आत्मसमर्पण केलेल्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यालाही उपस्थिती : यापूर्वी शरणागती पत्करलेल्या १३ पूर्वाश्रमीच्या नक्षल्यांचा एक सामूहिक विवाह सोहळा गडचिरोलीत आयोजित करण्यात आला होता, त्यालादेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सायंकाळी त्यांनी सी-60 जवानांचा सत्कार केला व अत्याधुनिक एके-103 शस्त्रे आणि एएसएमआय पिस्तुल व बुलेटप्रुफ जॅकेट्स प्रदान केली. त्यांच्या शौर्याची प्रशंसाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

बुलेटप्रुफ वाहने गडचिरोली पोलिसांच्या ताफ्यात दाखल : जिल्हा नियोजन विकास निधीतून १९ चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यातील काही बुलेटप्रुफ वाहने आहेत. त्यांच्या चाव्याही त्यांनी पोलीस दलाकडे सुपूर्द केल्यात. या दौऱयात मंत्री आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, पोलीस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.

सी-60 जवानांचा सत्कार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सी-60 जवानांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कवंडे आऊटपोस्टला मी भेट दिली आणि गावकर्यांशी संवाद साधला. आपल्या पोलीस दलाने अवघ्या 24 तासात कवंडे आऊटपोस्टचे निर्माण केले. हे केवळ पोलीस ठाणे नाही, तर शासन- प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आहे. जेथे सुरक्षेची कमतरता होती, तेथे पोलीस ठाणे उघडत शासन-प्रशासन जनतेपर्यंत पोहोचविले जात आहे. गेल्या दोन वर्षांत अशा 6 आऊटपोस्ट तयार केल्या."

मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचा संपवायचा आहे : "गेल्या दीड वर्षांत 28 नक्षलवादी मारले, 31 नक्षलवाद्यांना अटक झाली, तर 44 लोकांनी आत्मसमर्पण केले. हा एक नवीन रेकॉर्ड आहे. ज्यांच्यावर खूप मोठ्या रकमेची बक्षीसं होती, असेही अनेक आता नक्षलवाद सोडून सामान्य जीवनात परत येत आहेत. आपली ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. कवंडे येथे तर अतिशय कठीण ऑपरेशन्स आपल्या जवानांनी केले. ज्या बेटावर नक्षलवादी लपून बसले होते, ते ठिकाणही मी आज पाहिले. डोके पाण्यात बुडेल, अशा ठिकाणी कसब दाखवून तुम्ही ४ नक्षल्यांना यमसदनी धाडले, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचा खात्मा करायचा, हे आपले टार्गेट आहे. महाराष्ट्रात 4 वर्षांपासून नक्षल भरती पूर्णपणे थांबली होती. पण, अन्य राज्यातून ती व्हायची. पण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय कठोर पाऊले उचलली आणि आता नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आहे," असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नक्षलवाद्यांना इशारा दिलाय.

१२ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण : "ज्या १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यांच्यावर १ कोटी रुपयांपेक्षाही अधिक रुपयांचे बक्षीस होते. त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे. त्यांना भारताच्या संविधानाची प्रत आज आपण भेट दिली. लॉईडसारख्या उद्योगांनी पुनर्वसनात मोठा हातभार लावला आहे. हा जिल्हा रोजगारयुक्त करायचा आणि भारताचे पोलाद शहर म्हणून तो विकास करायचा आहे. हे करताना येथील निसर्गसंपदा, जल, जमीन, जंगल कायम ठेवूनच हा विकास करण्याचा शासनाचा निर्धार आहे," असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

नक्षलग्रस्त भागात परिवर्तनाचे वारे; गडचिरोली जिल्हा औद्योगिक केंद्र बनेल : छत्तीसगड सीमेलगतच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त कवंडे भागात आयोजित लाभार्थी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की "गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त व औद्योगिकदृष्ट्या सक्षम जिल्हा बनवण्याचा आमचा निर्धार आहे.शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांतून नक्षलग्रस्त भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले असून, शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे लोकांमध्ये शासनाबाबतचा विश्वास वाढला आहे. हीच खरी लोकाभिमुख विकास प्रक्रिया आहे. कवंडे,नेलगुंडा आणि पेनगुंडा या ठिकाणी नुकतीच ‘धरती आबा’ अभियानांतर्गत शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये एकूण 533 लाभार्थ्यांना विविध योजनांचे 987 लाभ वितरित करण्यात आले."

महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याला जोडणार्या पुलाची ड्रोनद्वारे पाहणी : नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील पूल एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे. दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी सुधारून विकासाची गंगा पोहोचवणे, हा शासनाचा दृढ निर्धार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ड्रोनच्या मदतीने त्यांनी या पुलाची पाहणी केली आहे.

हेही वाचा -