रायगड - जागतिक ख्यातीच्या घारापुरी बेटावरील नागरिकांच्या उपाजीविकेचं साधन म्हणजे, येथील एकमेव पर्यटक आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना विविध शोभेच्या वस्तू, रंगीत माळा, भेटवस्तू तसंच खाद्यपदार्थ विक्री करून गाठीला दोन पैसे कमावण्याचा प्रयत्न येथील स्थानिक करत आहेत. मात्र महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि पुरातत्व विभाग यांच्या नियमानुसार स्थानिकांच्या उपाजीविकेचं साधन असणाऱ्याच्या दुकानांवर अनेकदा कारवाईचा बडगा उगारला जातो. यासाठी येथील नागरिकांनी आपल्याला उपजीविकेचं कायमस्वरुपी साधन मिळावं यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना साकडं घातलं आहे.
जागतिक दर्जाच्या बंदराप्रमाणेच गावांचा विकास होईल - खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती उरण येथे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत घारापुरी यांच्या वतीने ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यात आल्या. यामध्ये घारापुरी हे जागतिक दर्जाचे बेट असल्याने येथील ग्रामस्थ पर्याटनावर आधारीत कटलरी दुकाने लाऊन उपजीविका चालवतात. मात्र महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्याकडून वारंवार दुकाने हटवण्यासाठी नोटिसा देऊन कारवाईचा बडगा उगारतात. ज्यामुळे येथील व्यावसायिकांना भीतीच्या सावटखाली व्यवसाय करावा लागत आहे. यासाठी ग्रामस्थांना कायमस्वरूपी दुकाने मिळाल्यास सदरचा प्रश्न निकाली निघेल. तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या मार्फत घारापुरी बेटाचा विकास आराखडा तयार केला असून त्याप्रमाणे विकास कामे सुरू आहेत. मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने सदरच्या कामांना मंजुरी मिळत नसल्याने कामं स्थगित आहेत. ही मंजुरी मिळाल्यास बेटाचा विकास होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे घारापुरी येथे विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास जागतिक दर्जाच्या बंदराप्रमाणेच येथील गावांचा विकास देखील होईल. अशा आशयाचे निवेदन यावेळी घारापुरी ग्रामस्थांनी खासदार श्रीरंग बारणे यांना दिलं आहे. यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव कदम, गट विकास अधिकारी वठारकार सर्व विभागाचे अधिकारी, सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर, सदस्या अरुणा घरत, हेमाली म्हात्रे, नीता ठाकूर, भारती पांचाळ उपस्थित होते.
दुकाने हटविणार नसल्याची खासदारांनी दिली हमी - मान्सूनमध्ये येथील पर्यटन बंद असते. त्यामुळे उर्वरित आठ महिने येथील नागरिक छोट्या दुकानांच्या माध्यमातून वर्षभराची बेगमी करत असतो. यामुळे ही दुकाने वाचावी अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर शासनाकडून विकास कामांसाठी मोठा निधी याआधीही दिला आहे आणि यापुढेही देणार. तसंच येथील कटलरी दुकानदारांची दुकाने हटवणार नाही अशी हमी खासदार बारणे यांनी ग्रामस्थ्यांना दिली आहे.