छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. जिल्ह्याचे तापमान एप्रिल महिन्यातच ४२ अंश सेल्सिअस तापमान पार करत आहे. वाढत्या तापमानामुळं माणसांसह प्राण्यांना देखील काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील एकमेव सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात दिवसातून दोनदा पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विशेषतः गरम रक्ताचा प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघांसाठी विशेष कुलर लावण्यात आले आहेत, तर शरीर थंड राहण्यासाठी हौदात दर दोन तासाला पाणी भरले जात असल्याची माहिती महानगरपालिका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीती सिंग यांनी दिली आहे.
वाघांसाठी पाण्याची व्यवस्था : शहरातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात सध्या वाघांसह आणि प्राण्यांसाठी उन्हापासून बचाव करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. प्राणी संग्रहालयात १२ वाघ असून त्यामध्ये ११ पिवळ्या रंगाचे तर १ पांढरा वाघ आहे. या वाघांमध्ये ५ बछड्यांचा समावेश आहे, त्यांना राहण्यासाठी ३ मोठे पिंजरे उभारण्यात आले आहेत. सध्या उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याने गरमी प्रचंड वाढली आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी महानगरपालिका वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. वाघ हा गरम रक्ताचा प्राणी असल्याने त्याचे शरीर अधिकवेळ थंड असावे, यासाठी त्यांच्यावर दिवसातून दोनदा पाण्याचे फवारे मारले जात आहेत. उन्हामुळे वाघांना सकाळी लवकर खाद्य दिले जाते. तसंच सकाळ आणि संध्याकाळ अशा दोनवेळा त्यांना बाहेर मोकळे सोडले जाते. मोकळ्या जागेतील हौदांमध्ये दर दोन तासाला पाणी सोडले जाते. त्यामुळे वाघ स्वतः पाण्यात बसून आपले शरीर उन्हापासून जपू शकतात, अशी व्यवस्था केल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीती सिंग यांनी दिली आहे.
पाण्याचे फवारे मारून दिला जातोय दिलासा : सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात शंभरहून अधिक प्राणी ठेवण्यात आले आहेत. ज्यामध्ये सर्वांचे लक्ष केंद्रित करणारा पट्टेदार वाघ, सिंह, बिबट्या, काळवीट, हरिण, साळिंदर, माकड, पक्ष्यांचा समावेश आहे. या सर्व प्राण्यांचा उन्हापासून रक्षण करण्यासाठी वेगवगेळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. वाघांच्या पिंजऱ्यात त्यांच्यावर पाईपद्वारे पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत. ते फवारे त्यांना इतके चांगले वाटत आहेत की जर पाणी बंद केले तर ते आक्रमक होत आहेत. त्यामुळे कधी दोनदा तर कधी तीनदा फवारे मारण्याचे काम मनपा कर्मचारी करत आहेत. वाघ मोकळा असला तर तो पाण्याच्या हौदात बसतो किंवा झाडाखाली विश्रांती करतो. त्याचबरोबर इतर प्राण्यांच्या ठिकाणी देखील पाण्याचे फवारे मारून परिसर थंड ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीती सिंग यांनी सांगितले.
उन्हामुळे रुग्ण वाढले : उन्हाचा पारा वाढत चालला असल्याने सर्व सामान्य माणसांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे. उन्हामुळे त्रास होत असल्याने बहुतांश लोक दुपारी बारानंतर बाहेर जाणे टाळत आहेत. आपापली कामे सकाळी अकराच्या आधी किंवा सायंकाळी सहानंतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. दवाखान्यांमुळे उन्हामुळे त्रास होत असल्याची तक्रारी घेऊन रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. दिवसाकाठी जवळपास तीनशे रुग्णांना उष्माघाताचा त्रास होत असल्याची माहिती समोर येत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
हेही वाचा :