छत्रपती संभाजीनगर : अवयवदानात राज्यातील अग्रणी जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडं पाहिलं जातं. बुधवारी रात्री एक अवयवदान प्रक्रिया पार पडली. बीड येथील शेतकरी गोकुळदास कोटुळे यांचा अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. डॉक्टरांनी रुग्ण ब्रेन डेड झाल्याचं सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तातडीनं कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानं तब्बल सात जणांना जीवनदान मिळालं. ही प्रक्रिया करताना पोलीस विभागानं अवघ्या काही वेळात कॉरिडॉर तयार करून अवयव मुंबई, अहमदाबादसह शहरातील रुग्णालयात पाठवण्यात आलं.
अपघातग्रस्त शेतकऱ्याचं अवयवदान : बीड जिल्ह्यातील वांगी गावातील शेतकरी गोकुळदास कोटुळे यांचा अपघातात ब्रेन डेड झाल्यावर कुटुंबीयांनी गॅलेक्सी रुग्णालयात अवयव दानाचा निर्णय घेतला. रुग्णालयाने तातडीनं पाऊल उचलत प्रक्रिया सुरू केली. गुकुळदास यांचे डोळे, किडनी, हृदय, यकृत, फुफ्फुसे दान करण्यात आलं. यातील हृदय मुंबईमधील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तर यकृत हे ग्लेनईगल्स हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं. फुफूस गुजरातच्या अहमदाबाद येथील केडिया रुग्णालयात पाठवण्यात आलं. किडनी गॅलेक्सी रुग्णालयात तर इतर अवयव एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती गॅलेक्सी रुग्णालयानं दिली.
बीड जिल्ह्यात झाला होता अपघात : गोकुळदास हे बीड जिल्ह्यातील वांगी येथील शेतकरी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा मुलगा सायकल घेण्यासाठी मागे लागला होता. मात्र पैशांची जुळवाजुळव नसल्यानं त्यांनी त्याला टाळलं. बुधवारी त्यांनी आपल्या मुलाला सायकल आणण्याची निर्णय घेतला. ते बीड येथे जिल्ह्याच्या ठिकाणी गेले. दुचाकीला सायकल बांधून घेऊन ते गावाकडे निघाले. गाव अवघे चार किलोमीटर राहिलेले असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यात गोकुळदास गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात आणण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी ब्रेन डेड झाल्याचं कुटुंबियांना सांगितलं. काही वेळानं अशा परिस्थितीतमध्ये इतरांना जीवनदान मिळू शकतं, याबाबत डॉक्टरांनी कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला.
पोलिसांनी केली व्यवस्था: शरीरातून अवयव काढल्यानंतर काही ठराविक वेळेत ते रुग्णालयात पोहचणं आवश्यक असल्यानं पोलिसांनी मदत कार्य सुरू केलं. रात्री शहरातील मुख्य रस्त्यांवर कॉरिडॉर तयार केला. विमानतळ रस्त्यावर तसेच खासगी रुग्णालयाच्या रस्त्यावर वाहतूक काही काळ थांबवून ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. त्यासाठी पोलीस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, 6 निरीक्षक, 15 पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह 120 पोलिस कर्मचारी तैनात झाले. अखेर सर्व अवयव वेळेत रुग्णालयात पोहचवण्यात आलं. एका रात्रीतून एका रुग्णामुळं सात जणांना जीवनदान मिळालं.
हेही वाचा -
- मोल अवयवदानाचं! लोकांना अवयव दानाचं महत्व पटवून देणाऱ्या राजोल पाटील या तरुणीची प्रेरणादायी कहाणी - Organ Donation Awareness
- Kinwat Trader Murder : मरावे परी कीर्ती रुपी उरावे, व्यापारी श्रीकांत यांचे अवयव दान ; मृत्युनंतर मिळाले आठ जणांना जीवदान
- मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या महिलेने दोन सैनिकांसहा पाच जणांना दिले जीवनदान