अमरावती : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र येण्यास वावगं काही नाही, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्यास सकारात्मकता दाखवली होती. एका मुलाखतीवेळी त्यांनी हे विधान केलं होतं. त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार अशी चर्चा रंगायला लागली आहे. "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या मध्ये भाजपाला येण्याचं कुठलंही कारण नाही. कोणी कोणाशी युती करावी हा त्या पक्षाच्या प्रमुखांचा निर्णय असतो," असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.
पक्षप्रमुखाला भूमिका मांडण्याचा अधिकार : "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकारी आहे. हा अधिकार प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला असतोच. अशावेळी भाजपानं त्यांच्या भूमिकेबाबत कोणताही आक्षेप घेण्याची गरज नाही," असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
अमरावती विमानतळाला देणार योग्य नाव : अमरावती विमानतळाला गुलाबराव महाराज आणि डॉ. पंजाबराव देशमुख या दोन नावांची चर्चा होत असताना यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय असा रस्त्यावर घेतला जाणार नाही. सरकारकडं तीन ते चार नावांचे प्रस्ताव आले आहेत. लोकांच्या मनात जे आहे तेच नाव अमरावती विमानतळाला दिलं जाईल, असं ते म्हणाले.
पश्चिम बंगालची परिस्थिती गंभीर : "पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून हिंदूंवर प्रचंड अत्याचार होत आहेत. पश्चिम बंगालमधून हिंदूंवर अत्याचार करणारे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. जो कोणी हिंदूंच्या बाजूनं बोलेल त्याची मान छाटली जाईल, अशी गंभीर स्थिती पश्चिम बंगालमध्ये आहे," असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोष व्यक्त केला.
हेही वाचा -