मुंबई- राज्यात सरकारने शैक्षणिक धोरणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय, यावर अनेकांनी टीका केलीय. याचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय. भाजपा किंवा त्यांच्या नेत्यांचं मराठी किंवा हिंदी भाषेवर प्रेम नाही. हे केवळ पालिका निवडणुकीसाठी पडद्यामागून चाललेलं नाटक आहे, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केलीय.
मोदी-शाहांना इंग्रजी येत नाही... : दरम्यान पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोदी-शाहांना इंग्रजी येत नाही, म्हणून ते आमच्यावर हिंदी लादत आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीत भाजपाचे काहीही योगदान नाही. हिंदी भाषेचं प्रेम आहे. पण आमच्यावर लादू नका आणि भाजपाची लोक हिंदी लादत आहेत. मराठीविषयी भाजपाची लोक ठामपणे बोलत नाहीत. महाराष्ट्रात मराठी ही आमची राजभाषा आहे आणि तिचा सन्मान हा झालाच पाहिजे. अजूनही राज्यात काही ठिकाणी मराठी भाषा सक्तीची केली नाही. ती का केली नाही? असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित करत राज्य सरकारवर प्रहार केलाय.
हिंमत असेल तर इंटरनॅशनल शाळांत मराठी भाषा : हिंदी सिनेमा, नाटक आणि साहित्य हे महाराष्ट्राच्या मातीत आहे. ते आम्हाला कोणी शिकविण्याचे गरज नाही. आम्हाला शिकवू नका. हिंदी ही भाषा गुजरातला शिकविण्याची गरज आहे. मराठीविषयीचं भलंमोठं ट्विट सागर बंगल्यावरून आलं असावं म्हणून हे उद्योग सुरू झालेत. बेळगावात मराठी भाषकांवर अत्याचार सुरू आहेत आणि इथे हिंदी भाषा सक्तीची केली जातेय. हिंदी संवादात्मक भाषा आहे. आधी मराठी भाषा सक्तीची करा आणि हिंमत असेल तर इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सक्तीची करा, असे आव्हान संजय राऊतांनी दिलंय.
कोणत्याही भाषेचा महाराष्ट्रावर बलात्कार होणार नाही : मागे भैय्याजी जोशी घाटकोपरमध्ये येऊन बोलले की, इथली भाषा गुजराती आहे. त्यावर कोणी बोलले नाही. हा महाराष्ट्र आहे येथे मराठीच चालणार, मराठी भाषेचा सन्मान हा झालाच पाहिजे, हिंदी ह्या देशात राहणार आहे. देशाच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. तुम्ही आम्हाला काय हिंदी शिकवणार, आम्ही यूपी, बिहारवाल्यांना हिंदी शकवू, आमचे चांगले हिंदी आहे. एकनाथ शिंदेंना तर हिंदीचे क्लासेस लावावे लागतील. हे केवळ सुपारीचे धंदे सुरू आहेत आणि कोणत्याही भाषेचा महाराष्ट्रावर बलात्कार होणार नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही, असंही संजय राऊत म्हणालेत.
किती वेळा कपडे बदलणार : आम्ही हिंदी नाही तर हिंदू आहोत, असं मनसेनं म्हटलं आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ते कधी हिंदू झाले? कुठून तरी आलेलं स्क्रिप्ट वाचतात. ते कधी हिंदू, कधी बिंदू, कधी सिंधू असतात. काय ते एकदा ठरवा. एकच प्याला नाटकातील सुधाकरसारखे बोलू नका, असा टोला संजय राऊत यांनी मनसेला लगावला. तसेच ते बाळासाहेबांची कॉपी करतात. ठाकरे हे हिंदू असणार नाहीतर कोण असणार. हे सगळं जुनं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही भूमिका बदलता, त्यामुळं तुम्ही किती वेळा कपडे बदलणार, अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केलीय.
हेही वाचाः