नागपूर: नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 'सोशा' रेस्टॉरंटचे संचालक अविनाश भुसारी यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यामध्ये अविनाश भुसारी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. गॅंगवॉरमधून हे हत्याकांड घडलं होतं. १५ दिवसांपासून फरार असलेल्या आरोपींना अखेर पोलिसांनी अटक केली. हिरणवार टोळीनं अविनाश भुसारी यांची हत्या केल्याचं तपासात आधीच स्पष्ट झालं होतं. मात्र, आता हत्येच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी अविनाश भुसारीची हत्या करण्यापूर्वी अनेक दिवस बंदूक चालवण्याचा आणि नेम कसा धरावा याचा सराव केला होता. या प्रकरणात आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल माखणीकर यांनी दिली.
अविनाश भुसारीची हत्या: बंटी हिरणवार याचा भाऊ पवन हिरणवारची ३ जानेवारीला हत्या झाली होती. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंटी हा कोणत्याही थराला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानं आपल्या काही साथीदारांसह प्रवेश गुप्ता याची हत्या करण्याचा कट रचला. परंतु ऐनवेळी प्लॅन फसल्यानं आरोपींनी अविनाश भुसारीची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी बंटी हिरणवारसह पाच आरोपींना अटक केली.
हिरणवार टोळीचा सहभाग उघडकीस आला : १५ एप्रिलच्या रात्री 'सोशा' रेस्टॉरंटचे संचालक अविनाश भुसारी हे त्यांच्या रेस्टॉरंट बाहेर उभे होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी अचानकपणे बेछूट गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये अविनाश भुसारी यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी एकूण सहा राउंड फायर केले. अविनाश भुसारी यांच्या हत्येमागील कारण काय असावं, याचा शोध पोलिसांनी सर्वात आधी घेण्यास सुरुवात केली होती. कारण अविनाश भुसारी यांचं कोणत्याही गॅंग सोबत काही घेणं-देणं नसतानाही हे हत्याकांड घडलं होतं. प्राथमिक तपासातच या हत्याकांडामागे कुख्यात हिरणवार टोळी असल्याचं स्पष्ट झालं होतं.
प्रवेश गुप्ता आरोपींच्या टार्गेटवर होता : १४ एप्रिल रोजी आरोपीनी प्रवेश गुप्ताचा काटा काढण्याचा कट रचलेला होता. १४ एप्रिल रोजी प्रवेश गुप्ता हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने मोठी रॅली काढतो. त्या रॅलीमध्ये प्रवेश गुप्तावर गोळीबार करून त्याची हत्या करण्याचं प्लॅनिंग आरोपींनी केलं होतं. मात्र, ऐनवेळी प्रवेश गुप्ता त्या रॅलीत सहभागी झालाचं नाही. त्यामुळं आरोपींचे प्लॅनिंग फसले. तर प्रवेश गुप्ता हा शेखु टोळीचा प्रमुख सदस्य आहे.
'या' कारणानं केली अविनाश यांची हत्या : रॅलीत फायरिंग करत आरोपींनी शेखु टोळीच्या प्रवेश गुप्ता याची हत्या करण्याची प्लॅनिंग केलं होतं. या माध्यमातून आरोपींना काचीपूरा भागात दहशत निर्माण करायची होती. मात्र, प्रवेश गुप्ता रॅलीत सहभागी न झाल्यानं आरोपींचं प्लॅनिंग फसल्यानंतर ते तिथून निघून गेले होते. आरोपी रामनगर परिसरात फिरत असताना अविनाश भुसारी त्यांना 'सोशा' रेस्टॉरंटच्या बाहेर उभे असल्याचं दिसलं. हिरणवार टोळीतील पवनची हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपीचे अविनाश चुलत भाऊ असल्याची माहिती या आरोपींना होती. प्रवेश गुप्ताच्या हत्येचा प्लॅन हा फसल्यानंतर पवन हिरणवारच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या आरोपींनी लगेचच अविनाश यांच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर अवघ्या काहीच मिनिटांमध्ये गोळीबार करत आरोपींनी अविनाश भुसारीची हत्या केली.
आरोपींना सिनेस्टाइल अटक : अविनाश भुसारी यांची हत्या केल्यानंतर आरोपी विविध दिशेने पळाले. दोन आरोपी एकाच ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथून ट्रेनने गोंदियाला जात असल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचला. मात्र, पोलिसांना बघून आरोपींनी पळून जाण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी घेतली. त्यावेळी पोलिसांनीही जीवाची पर्वा न करता ट्रेनमधून उडी घेत आरोपींना अटक केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
वर्चस्वाच्या लढाईतून गॅंगवॉर : नागपुरात गेल्या काही महिन्यांपासून हिरणवार विरुद्ध शेखु टोळीतील संघर्ष अधिकच पेटलेला आहे. ३ जानेवारी रोजी जिल्ह्यातील खपरखेडा भागातील बाबूळखेडा शिवारात शेखु टोळीच्या गुंडांनी हिरणवार टोळी पाठलाग करत अंदाधुंद गोळीबार करत पवन हिरणवारची हत्या केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी हिरणवार टोळी तयारी करत होती. त्यातून अविनाश भुसारीची हत्या झाली आहे.
पवन हिरणवारच्या हत्येचा बदला घेण्यासाठी... : वर्षाच्या सुरुवातीला ३ जानेवारी रोजी नागपूर जिल्ह्यातील खपरखेडा भागातील बाबूळखेडा शिवारातमध्ये शेखु टोळीच्या गुंडांनी हिरणवार टोळी पाठलाग करत अंदाधुंद गोळीबार केलेला ज्यामध्ये पवन हिरणवार नामक तरुणाचा मृत्यू झालेला होता. पवन हिरणवार आणि दोन मित्र कारने जात असताना तीन दुचाकीवरुन आलेल्या पाच आरोपींनी पाठलाग सुरू केला. आरोपींनी पवन हिरणवारच्या कारवर अंदाधुंद गोळीबार केला. ज्यामध्ये एक गोळी पवन हिरणवारला लागली, त्यात पवन हिरणवारचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पवन हिरणवारच्या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणून अविनाश भुसारीवर गोळीबार करण्यात आला.
हेही वाचा -