मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे नेते आशिष शेलार हे एकमेकांचे पक्के मित्र म्हणून ओळखले जातात. पण आता याच मैत्रीमध्ये दुरावा आल्याचं समोर आलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतच्या बातमीवर जेव्हा आशिष शेलारांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा शेलारांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली. "आता वैयक्तिक मित्र विषय संपला," असं म्हणत आशिष शेलार यांनी त्यांची भूमिका जाहीर केली.
उद्धव ठाकरेंची अट की राजकीय कट? : "राज ठाकरेंशी हातमिळवणी करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात काही अटी ठेवल्या. मात्र, ती अट आहे की राजकीय कट आहे," अशी शंका सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी उपस्थित केली. वाद वैयक्तिक गेल्याने राज ठाकरे यांच्याकडून देखील पक्षातील नेत्यांना थेट शेलारांना टार्गेट करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर संदीप देशपांडे यांच्याकडून आशिष शेलार यांच्यावर टीका करण्यात आली.
वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला : आशिष शेलारांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी "उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे जाणार असतील तर एक जुना सहकारी म्हणून तुमचे मत काय?" असा सवाल शेलारांना विचारला. यावर प्रतिक्रिया देताना शेलारांनी "वैयक्तिक वगैरे हे आतापर्यंतचे शब्द पुरे करा. माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते. तो विषय आता संपला," अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राज-आशिष मैत्रीतले वाद : 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रचारावेळी राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ'ला आशिष शेलार यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या सभेला व्हिडिओ लावतच उत्तर दिलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी खोकेबाज असा उल्लेख केल्यानंतरही शेलार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातील वाद राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा -