बीड : सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १४ एप्रिलला घडली होती. धार्मिक स्थळावर सुरू असलेल्या भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती महिला वकिलानं सरपंचांकडं केली होती. यावरून "गावातील धार्मिक विधी करू देणार आहात की नाही," अस वक्तव्य गावच्या सरपंचानं केलं. एवढ्यावर न थांबता सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी महिला वकिलाला पाईपनं बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती की, महिला वकिलाच्या अंगावर काळे-निळे वळले उठलेत. ही घटना उघड होताच एकच खळबळ उडाली आहे.
महिला वकिलानं केले गंभीर आरोप : " गावातील एका धार्मिक स्थळावरील भोंग्याचा आवाज तीव्र होता. त्यावेळी मी अभ्यास करत होते. भोंग्याच्या आवाजामुळं माझा अभ्यास होत नव्हता. त्यावेळी मी गावच्या सरपंचांना भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली. त्यावेळी कर्मचाऱ्याला भोंग्याचा आवाज कमी करायला सांगतो, अस त्यांनी सांगितलं. यानंतर दोन तास उलटूनही भोंग्याचा आवाज कमी झाला नाही. त्यामुळं मी सरपंचांना पुन्हा फोन लावला. त्यावेळी ते म्हणाले, कर्मचारी माझा फोन उचलत नाही. त्यामुळं मी त्या कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली. तेव्हा कर्मचारी म्हणाला, मी आज मासांहार केलाय. त्यामुळं धार्मिक स्थळात प्रवेश करू शकत नाही. यानंतर मी ही घटना फोनवरून सरपंचांना सांगितली. त्यावेळी त्यांनी मला याप्ररकणी पोलिसांत तक्रार करायला सांगितलं. त्यामुळं मी पोलिसांत याबद्दल फोनवरून तक्रार केली. यानंतर पोलिसांनी धार्मिक स्थळावरील भोंग्याचा आवाज केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सरपंच आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन आमच्या घरी आला. तुम्हाला गावातील धार्मिक कार्यक्रम करू द्यायचे आहेत की नाही? असा प्रश्न विचारत त्यानं आमच्यावर दबाव टाकला. या प्रकारानंतर सरपंचानं पिठाच्या तीन गिरण्या आमच्या घराच्या बाजूला सुरु केल्या. त्यांच्या सततच्या आवाजामुळं मला मायग्रेनचा त्रास झाला. यासह मला पाठदुखीची समस्याही जडली," असा गंभीर आरोप महिला वकिलानं प्रतिक्रिया देताना केला.
दोषींवर कारवाई करणार : "बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली, त्यांचे फोटो कालरात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. जे दोषी असतील, त्यांच्यावर योग्य कारवाई देखील केली जाणार आहे. इथं अशा अमानुष मारहाणीला कधीही समर्थन करणार नाही," अशी तटस्थ भूमिका घेत अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना प्रतिपादन केलं आहे.
हेही वाचा :