पुणे: साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला (Dagdusheth Halwai Ganpati) आज ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. गणपती मंदिर प्रवेशद्वार ते गाभाऱ्यापर्यंत आंब्यांनी सजावट करण्यात आली आहे.
११ हजार आंब्यांचा महानैवेद्य : गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट, अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून गायिका वेदश्री खाडिलकर ओक यांनी गणराया चरणी गायन सेवा अर्पण केली. पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला. तर पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटूंबियांच्या वतीनं हा महानैवैद्य दाखवण्यात आला. तर गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आणि आब्यांची आरास पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केलीय.
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व : वैशाख महिन्याची तृतीया म्हणजे 'अक्षय्य तृतीया'. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते. कारण या तिथीला सुरू झालेली कामे किंवा केलेली कामे अक्षय्य राहते, अशी समाजामध्ये भावना आहे. 'अक्षय्य' या शब्दाचा अर्थ म्हणजे कधीही क्षय न होणारे, म्हणजेच कधीही न संपणारे! ज्या पद्धतीने सौर ऊर्जा म्हणजेच सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय्य मानली गेली. त्याचप्रमाणे जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय्य मानली गेली आहेत. पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षवधी वर्षे लोटली. मात्र, या अक्षय्य गोष्टी आजही अस्तित्वात असून, जोपर्यंत पृथ्वी आहे, तोपर्यंत या गोष्टी कायम असतील, असे सांगितले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.


हेही वाचा -