नंदुरबार: जग आत्याधुनिक युगाकडं वळत असताना ग्रामीण भागात काही परंपरा अद्यापही सुरूच आहे. त्यातीलच एक परंपरा म्हणजे शेतात सालगडी म्हणून निवडण्याची ही अनोखी परंपरा आहे. शहरातील माळीवाडा परिसरात अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) दिवशी सव्वा मनचा (सुमारे ९० किलो) दगड उचलण्याची वर्षानुवर्षांची परंपरा जोडली गेली आहे. हा दगड जो सालदार (शेतात काम करणारा) उचलेल त्याला सर्वाधिक वर्षाचा दाम दिला जातो आणि जो अयशस्वी होतो त्याला देखील काम मिळतं, परंतु त्याचा दाम त्याच्या योग्यतेनुसार दिला जातो. ही परंपरा काही प्रमाणात लुप्त झाली आहे. मात्र, माळीवाड्यात ही परंपरा तरुणांनी कायम ठेवली आहे. आजही परिसरातील 50 पेक्षाअधिक युवक दगड उचलण्यासाठी उत्सुक आहेत.
आजही ही दगड उचलण्याची परंपरा कायम : आधुनिक युगात अजूनही बहुतेक जुन्या जाणत्यांनी लावून ठेवलेल्या परंपरा सुरूच आहेत. त्यातील एक परंपरा म्हणजे सालदारने (शेतात काम करणारा) दगड उचलून आपली योग्यता साबित करण्याची परंपरा. साधारण या दगडाचं वजन सव्वा मण असल्याचं जुने जाणते सांगतात. शेतीची कामे करण्यासाठी जो शेतगडी असतो त्याची खान्देशात अक्षय्य तृतीयेला निवड केली जाते. प्रत्येक भागात सालदार निवड करण्याची वेग-वेगळी पद्धत आहे. तर माळीवाडा परिसरात सालगडी ठरविण्याची वेगळी पद्धत वर्षोनावर्षं जोपसली जात आहे.
अक्षय्य तृतीयेचा निवडला जातो मुहूर्त : अक्षय्य तृतीयेला सालदारचं वर्षभराचं पॅकेज ठरवलं जातं. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत कामगारांची नियुक्ती करताना त्याचा अनुभव आणि अनेक चाचण्या घेतल्या जातात. त्याचप्रमाणे शेतात वर्षभर राबणाऱ्या गड्याची नियुक्ती करताना वर्ष भराचा पगार म्हणजे साल ठरविण्यासाठी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्त निवडला जातो. गड्याचं साल ठरवताना त्याची ताकद आणि चिकाटी पहिली जाते. ही परंपरा आजही माळीवाडा परिसरात कायम आहे. या गड्याची निवड करण्यासाठी या भागातील चौकात असेल्या दोन मोठ्या दगडांची (गोट्याची) पूजा केली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी आलेले तरुण या गोट्यांना उचलण्याचा प्रयत्न करतात. जो तरुण हा गोटा उचलेल त्यांच्या वर्षाचा पगार ठरविण्याची लगबग सुरु होते. यावर्षी सालदारांचे वर्षभराचे पॅकेज 60 हजारापासून ते एक लाख 10 हजार रुपयापर्यंत ठरवण्यात आलं आहे. त्यासोबत त्याला कपड्याचे दोन जोड आणि दोन पोते धान्य दिलं जातं. जो यशस्वी होतो त्याला त्याची योग्यता पाहून पैसे आणि धान्य दिलं जातं. तर माळीवाडा परिसरात ही शकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आजही टिकून आहे.
सालदारचा होतो अक्षय्य तृतीयेला मानपान : साल ठरविल्यानंतर सालदारला (शेतात काम करणारा) अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शेत मालकाकडून त्याचा मानपान केला जातो. त्याला नवीन वस्त्र दिलं जातं. त्याचप्रमाणे सालदार आणि त्याच्या परिवाराला पुरणपोळीचं जेवण घर मालकाकडून खाऊ घातलं जातं. त्याचबरोबर त्याला ठरविण्यात आलेल्या साल (पॅकेज)च्या रकमेपैकी काही रक्कम ॲडव्हान्स दिली जाते आणि तो सालदार वर्षभरासाठी शेत मालकाचा बांधील होतो.
आधुनिक युगामुळं परंपरा लुप्तीच्या मार्गावर : आधुनिक युगात सालदार ही परंपरा काहीशी लुप्त पावत आहे. जे काम सालदार करत होते तेच काम आज ट्रॅक्टरद्वारे केलं जातं. त्यामुळं सालदार ही परंपरा काही प्रमाणात लुप्त झाली असली तरी, ग्रामीण भागातील काही भागांमध्ये ही परंपरा अजूनही कायम आहे.
हेही वाचा -