पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विविध कार्यक्रमाच्या अंतर्गत एकत्र येताना पाहायला मिळत आहे. आज देखील अजित दादा आणि शरद पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, साखरपुडा असला की परिवार म्हणून एकत्र येत असतात आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यात बाकीच्यांना काही चर्चा करण्याचा अधिकार नाही. तसेच पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी देखील सदस्य म्हणून काम करतो. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात अनेक नेते असतात आणि मुलांच्या भवितव्यासाठी ती बैठक होती, म्हणून मी तिथ गेलो आणि आज कृषी क्षेत्रात एआय बाबत बैठक होती. यामुळे काही विषयाना राजकारणाच्या पलीकडे बघितलं पाहिजे. सगळ्याच गोष्टीत राजकारण आणलं गेलं नाही पाहिजे, असं यावेळी अजित पवार म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज साखर संकुल येथे कृषी क्षेत्रात एआय वापराबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आदी मान्यवर उपस्थित आहेत. कृषी क्षेत्रात एआय वापराबाबत बैठकीत चर्चा झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले की, आता राज्याच्या तसेच देशाच्या निवडणुका या झाल्या असून दोन्ही ठिकाणी पाच वर्षासाठी सरकार आलंय. जनतेला दिलेल्या शब्दांसाठी विचारांची देवाण घेवाण केली पाहिजे असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आज सकाळी नऊ वाजता कृषी मंत्री कृषी आयुक्त यांच्या सोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस उत्पादनात वाढ याबाबत बैठक झाली. तसंच ऊस, कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका अशा सहा पिकांसाठी एआय वापराचा विचार यावेळी झाला. याबाबत ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना जे काही फायदे मिळून द्यायचे आहेत, त्यात एआयचा वापर केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी हक्काच्या घराचं स्वप्न साकारलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पुणे विभागात ३५ हजार घरांच्या निर्मितीचा कार्यक्रम देखील हातात घेण्यात आला आहे. जागा उपलब्ध करत चांगल्या बांधकामाला सुरवात झाली आहे आणि यामुळे गरिबांचं स्वप्न हे लवकरच पूर्ण होणार असल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले.
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की ते एका राजकीय पक्षाचे आमदार होते आत्ता ते पराभूत झाले आहेत. त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. मला याबाबत बोलण्याचा काहीच अधिकार नाही असं यावेळी अजित पवार म्हणाले. २६/११ मधील हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सहभागी झाले होते असा आरोप भाजपा नेते माधव भंडारी यांनी केला आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असतं ते म्हणाले की, सरकार त्यांचं असून यासंदर्भात त्यांनी चौकशी करावी.
हेही वाचा...