स्टील कंपन्यांबरोबर राज्य सरकारचे 80 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार; विदर्भ, मराठवाड्यात 40 हजारांहून अधिक रोजगारनिर्मितीची अपेक्षा
मुंबईतील गोरेगाव येथे स्टील महाकुंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राज्य सरकारनं 9 कंपन्यांशी 80 हजार 962 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत.

Published : September 20, 2025 at 7:45 AM IST
मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथे एआयआयएफए (आयफा) आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात राज्य सरकारच्या उद्योग विभागानं 9 कंपन्यांशी 80 हजार 962 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. या गुंतवणुकीमुळे राज्यात एकूण 40 हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे प्रकल्प जिल्हानिहाय उभारले जाणार असून त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर आणि सातारा यांचा समावेश आहे.
या नव्या गुंतवणुकीमुळे विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. तसेच या प्रकल्पांमुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला. हे करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रकल्प कुठे उभारले जाणार?
- गडचिरोली
- चंद्रपूर
- नागपूर
- वर्धा
- रायगड
- छत्रपती संभाजीनगर
- सातारा
कोणत्या जिल्ह्यात कोणता प्रकल्प आणि गुंतवणूक?
- वर्ध्यात रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि. 25 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक स्टील प्रकल्प, यामुळे 12 हजार रोजगारनिर्मिती.
- छत्रपती संभाजीनगरात एनपीएसपीएल अॅडव्हान्स्ड मटेरियल (अथा ग्रुप) प्रा. लि. तर्फे 5 हजार 440 कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘क्रिटिकली अॅडव्हान्स्ड लिथियम बॅटरी मटेरियल आणि कार्बन कॉम्प्लेक्स’ उभारला जाणार. यामुळे 5 हजार रोजगारनिर्मिती
- गडचिरोलीत सुमेध टुल्स प्रा. लि. आणि हरिओम पाइप इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पांमुळे सुमारे 5 हजार 500 रोजगारनिर्मिती आणि 5 हजार 135 कोटी रुपयांची गुंतवणूक.
- रायगडमध्ये जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचा 41 हजार 580 कोटी रुपयांचा स्टेनलेस स्टील प्लांट उभारणार, ज्यामुळे तब्बल 15 हजार 500 रोजगारनिर्मिती होणार.
- चंद्रपूर येथे आयकॉन स्टील इंडिया प्रा.लि. 850 कोटी रुपयांच्या स्पंज प्रकल्पामध्ये गुंतवणूक करत असून यातून 1500 रोजगार निर्माण होतील.
- वाई येथे फिल्ट्रम ॲटोकॉम्प प्रा.लि. हे 100 कोटी रूपयांची ऑटोमोटिव्ह स्टील पार्टमध्ये गुंतवणूक करत असून याद्वारे 1200 रोजगार निर्मिती होणार आहे.
- नागपूर येथे जयदीप स्टीलवर्क इंडिया प्रा.लि. ही कंपनी आयएसपी प्रकल्पाकरिता 1375 कोटी रूपयांची गुंतवणूक करेल, यातून 600 रोजगार निर्मिती होणार आहे.
हेही वाचा
- 2029 पर्यंत ईशान्येकडील राज्यांच्या राजधान्या रेल्वे मार्गानं जोडल्या जाणार; चार राज्यांमध्ये काम पूर्ण, अन्य ठिकाणी प्रगतीपथावर!
- मुंबईत दुसऱ्या भुयारी मेट्रोला हिरवा कंदील; वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 15 मिनिटांत पार करता येणार
- जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलरचा प्रकल्प महाराष्ट्रात, एप्रिल 2026 पर्यंत काम पूर्ण होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

