रायगड - आजच्या युगातील 'कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान' हे फक्त संगणकीय संकल्पना न राहता, मानवी विचारशक्तीला टक्कर देणारी यंत्रणा बनली आहे. या तंत्रज्ञानाची दुसरी बाजू विचारात घेतल्यास या तंत्रज्ञानाकडे अंधपणे न पाहता त्याचे नैतिक आणि सामाजिक परिणाम समजून घेणे गरजेचे असल्याचे मत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रख्यात जाणकार अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले आहे. उरणमधील एका हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पारंपरिक नोकऱ्यांची व्याख्या नव्याने केली जाईल - 'माहिती तंत्रज्ञान' हे आज अनेकांच्या दैनंदिन वापरातील गरज बनू लागली आहे. गेल्या चार दशकांपेक्षा अधिक काळापूर्वी १९८० साली संगणकाचा प्रारंभ मोठ्या आणि मर्यादित वापराच्या यंत्रापासून झाला आणि संगणकाचे घराघरात आगमन झाले. तर, संगणकीय क्षमतेतील प्रचंड वाढ, डेटा उपलब्धतेतील क्रांती आणि प्रगत गणनात्मक मॉडेल्समुळे या क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. त्यामुळे 'माहिती तंत्रज्ञान' ही केवळ तांत्रिक संकल्पना न राहता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनू लागली आहे. त्यातच, घरगुती उपकरणासह विविध क्षेत्रांमध्ये एआयचा प्रभावी वापर वाढ ही तंत्रज्ञान-व्यवस्था केवळ यंत्रांसाठी काम करणारी प्रणाली नसून आता ती मानवी 'विचारशक्ती'चे अनुकरण करू लागली आहे. आज 'जनरेटिव्ह-एआय' आणि 'मल्टीमॉडेल-एआय' सारख्या तंत्रज्ञानातील या प्रगतीमुळे अनेक व्यावसायिक नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहे. यामुळे, पुढील काही वर्षांत अनेक पारंपरिक नोकऱ्यांची व्याख्या नव्याने केली जाईल आणि त्यांचं स्वरूपही बदलत जाईल, असं मत अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आणि स्वयंचलित प्रणालीमुळे समाजात लक्षणीय बदल होत असून पारंपरिक नोकऱ्यांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. मात्र, तांत्रिक कौशल्य असलेल्या व्यक्तींना नव्या संधीही निर्माण होत असल्याचे गोडबोले यांनी म्हटले आहे.
नैतिक व सामाजिक परिणाम समजून घेणे गरजेचे - ए.आय. तंत्रज्ञानाची दुसरी बाजू विचारात घेतल्यास या तंत्रज्ञानाकडे अंधपणे न पाहता त्याचे नैतिक व सामाजिक परिणाम समजून घेणे गरजेचे आहे. यामुळे, शासन, कंपन्या आणि नागरिक यांनी एकत्र येऊन जबाबदार धोरणे तयार करणे, ही काळाची गरज असल्याचे मत अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले आहे.