सांगली : आटपाडी येथील एका १७ वर्षांच्या तरुण शेतकऱ्यानं डाळिंबाची यशस्वी शेती केली आहे. शुभम मरगळे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. त्यानं १४ एकरमधून तब्बल ८० टन डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेतलं आहे. वडील आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली शुभमनं डाळिंब शेतीत पाऊल ठेवलं आणि डाळिंबाची बाग फुलवली आहे.
तब्बल ८० टन डाळिंबाचे उत्पादन : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला डाळिंब पिक शेती वरदान ठरली आहे. कमी पाण्यात शेतकऱ्यांना अधिकच उत्पादन देणारे पीक म्हणून डाळिंबाच्या शेतीकडं पाहिलं जातंय. पण या शेतीला देखील अलीकडच्या काळात वेगवेगळी आव्हानं निर्माण झालीत. त्यामुळं अनेक शेतकरी कर्जबाजारी आणि आत्महत्याग्रस्त सुद्धा झाले आहेत. पण, आटपाडीमधील अवघ्या १७ वर्षांच्या शुभम मरगळे या तरुण शेतकऱ्यानं एक, दोन नव्हे तर तब्बल १४ एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग फुलवली आहे. यातून शुभमनं तब्बल ८० टन डाळिंबाचे उत्पादन घेतलंय.
डाळिंब शेती वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न : शुभमनं नुकतीच दहावीची परीक्षा दिलीय. शालेय शिक्षणासोबत शुभमनं शेतीचेही धडे घेतले आहेत. त्यामुळं गेल्या वर्षभरात शुभम आपल्या वडिलांची असणारी डाळिंब शेती वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला. त्यातून १५ एकर असणाऱ्या शेतीमध्ये १४ एकर शेतीवर डाळिंबाची शेती केली आहे. याबाबत "ईटीव्ही भारत"शी बोलताना शुभम म्हणाला की, "डाळिंबाची शेती करत असताना शाळेत अनेकदा हजर राहता आलं नाही. पण शाळा आणि शेती अशा दोन्हींचं समन्वय साधून डाळिंबाची शेती केलीय. यामध्ये ४ हजार झाडं डाळिंबाची लावली होती. यामधून आता वर्षाकाठी ८० टनाच्या आसपास डाळिंबाचे उत्पादन मिळू लागलंय".
वर्षाकाठी एक कोटीहून अधिक उत्पन्न : याचबरोबर, "यंदाच्या वर्षी आपल्या डाळिंबाला उच्चांक असा २६५ रुपये आणि सरासरी १३५ रुपये इतका दर मिळालेला आहे. डाळिंब शेतीतून वर्षाकाठी एक कोटीहून अधिक उत्पन्न मिळत आहे. ज्यातून खर्च वजा जाता, साठ लाख रुपये निव्वळ नफा आपल्याला मिळत आहे", असं शुभमनं सांगितलं. तसंच, पुढं तो म्हणाला, "डाळिंब शेती करताना वडील हिंदुराव मरगळे, काका सर्जेराव व विजय मरगळे यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. सर्वांनी मला डाळिंब शेती करताना पाठबळ दिलं. तसंच, शिक्षणासाठी देखील फार दबाव टाकला नाही, पण शिक्षण आणि शेती अशा दोन्हींचा मध्य राखला. ज्यामुळेच डाळिंब सारख्या शेतीमध्ये मला यशस्वी शेतीचा प्रयोग करता आला", असंही "ईटीव्ही भारत"शी बोलताना शुभमनं सांगितलं.
डाळिंब शेतीसाठी आटपाडी तालुका प्रसिद्ध : दरम्यान, डाळिंब शेतीसाठी आटपाडी तालुका महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पिकणाऱ्या डाळिंबाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशासह जगभरात देखील मोठी मागणी आहे. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना डाळिंबाचं पीक गेल्या काही वर्षात वरदान ठरलेलं आहे. आता या भागामध्ये कृष्णा नदीचं पाणी टेंभू सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील गावागावात पोहोचत आहे. त्यामुळं या भागातल्या शेतकऱ्यांना डाळिंब शेतीमध्ये आता अधिकच उत्पादन घेण्यासाठी सोयीचं ठरत आहे.
हेही वाचा :
"आमच्यातले वाद, भांडण छोटी", राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना युतीसाठी पुन्हा टाळी ?
'औरंगजेबानं नागरिकांवर अत्याचार केले, मात्र काही लोक त्याला नायक मानतात': राजनाथ सिंहांचा हल्लाबोल