नांदेड : संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वच्छतेचा आणि सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन पिंपरी चिंचवड इथल्या अवलियानं प्रयत्न सुरू केले आहेत. स्वच्छतेचा आणि प्लास्टिक पिशवी मुक्तीचा जागर करण्यासाठी चक्क मोटारसायकलवरून महाराष्ट्रात फिरुन प्रचार आणि प्रसार करून जनजागृती केली आहे. यशवंत कन्हेरे असं या अवलियाचा नाव आहेत. ते ६९ वर्षे वयाचे आहेत. त्यांचा हा मोटारसायकलवरील प्रवास आणि अनुभव आजच्या पिढीला नक्कीच विचार करायला लावणारा आहे.
जनजागृतीसाठी मोटरसायकलवरून राज्यभर प्रवास : पुण्यातील पिंपरी चिंचवड इथले रहिवासी असलेले यशवंत कन्हेरे यांनी वयाच्या ५२ व्या वर्षीच एका खासगी बजाज कंपनीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. यानंतर त्यांनी प्रदुषण, कचरा, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटली अशा प्रकारच्या अवास्तव आणि चुकीच्या पद्धतीनं वापर होतो. यामुळं पर्यावरणाची हानी, मनुष्यावर होणारा दुष्परिणाम याची माहिती सांगण्यासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा जागर पिंपरी चिंचवडपूरता मर्यादित राहिलेला नाही. ते संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छतेचा प्रचार करत आहे. त्याचबरोबर त्यांनी आता चक्क मोटारसायकलवरून राज्यभर प्रवास करत जनजागृती करत आहेत.
४५ दिवसांत २७ जिल्ह्यात प्रवास : यशवंत कन्हेरे यांनी संत गाडगे महाराज जयंतीचे औचित्य साधून २४ फेब्रुवारी २०२५ पासून पिंपरी चिंचवड इथून मोटारसायकलवर जनजागृतीची सुरूवात केली. रायगड, मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती, गडचिरोली, नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, भंडारा, जालना, परभणी, हिंगोली असा प्रवास करत नांदेडला पोहचले आहेत. ४५ दिवसांत कन्हेरे यांनी तब्बल २७ जिल्ह्यात प्रवास केला आहे. पुढील २० दिवसांत ते उर्वरित जिल्ह्यात प्रवास करणार आहेत.
यशवंत कन्हेरेंचा प्रवास प्रेरणादायी : यशवंत कन्हेरे हे दररोज सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत प्रवास करुन ठिकठिकाणी संस्था, शाळा, सार्वजनिक ठिकाणी, स्वच्छतेचे आणि प्रदुषण मुक्ती संदर्भात काम करणाऱ्यांना मार्गदर्शन करतात. तसंच ते स्वतः स्वच्छता करतात. हेल्मेट वापरा, प्लास्टिकचा वापर टाळा, ओला कचरा, कोरडा कचऱ्याचं वर्गीकरण करा, अशा पद्धतीच्या संदेश फलक घेऊनही ते प्रसार करत आहेत. ६९ व्या वर्षी सामाजिक बांधिलकी जपत राज्यभर मोटारसायकलवरून स्वच्छतेचा जागर करत प्रवास करणाऱ्या यशवतं कन्हेरे यांचा हा प्रवास इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : उद्याचं समृद्ध राष्ट्र बनवायचा असेल तर स्वच्छता, प्रदूषण तसेच प्लास्टिक मुक्तीचा जागर होण्याची गरज आहे. यशवंत कन्हेरे यांनी नांदेडच्या शाळा, हॉटेल यांची स्वछता करत नांदेड शहरातील बाबा नगर भागातील महात्मा फुले हायस्कूलमध्ये स्वच्छतेचा व प्रदुषण, प्लास्टिक मुक्तीचा जागर कार्यक्रम करताना यशवंत कन्हेरे हे विद्यार्थांना मार्गदर्शन करत आहेत.
हेही वाचा :
- महामुंबईत रेल्वे-बससाठी एकच तिकीट ते किल्ल्यांसाठी विशेष रेल्वे, जाणून घ्या, रेल्वेमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी कोणत्या केल्या घोषणा?
- एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महामंडळाला १२० कोटी तातडीने मंजूर, महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार; प्रताप सरनाईकांची माहिती
- कल्याणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्याधुनिक ज्ञान केंद्र १३ एप्रिलला होणार खुले