ठाणे : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात डोंबिवली शहरातील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांसह स्थानिक पोलीस प्रशासनाकडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरीकांचा शोध घेतला जात आहे. अशातच कल्याण, डोंबिवली शहरातून ६ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
कागदपत्रांची सखोल चौकशी : पोलीस उप आयुक्त परिमंडळ कल्याण झोन अंतर्गत कल्याण आणि डोंबिवली शहरात अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांबाबत शोध मोहीम राबविण्यात आली होती. त्या अनुषंगाने गोपनीय बातमीद्वारे कल्याण व डोंबिवली शहरातील संशयित व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांना पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यावेळी त्यांचेकडील आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात आली, असे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.
कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस : याचबरोबर, या चौकशीदरम्यान संशयित नागरिकांची कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले. यामध्ये एकूण ६ बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० चे कलम ३,४ विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १३.१४ (अ) (ब) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई महात्मा फुले चौक खडकपाडा बाजारपेठ पोलीस व टिळकनगर असे एकूण चार पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.
१६ गुन्हे दाखल करण्यात आले : दरम्यान, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ कल्याण हद्दीत आतापर्यंत एकूण ३८ अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही कल्याण व डोंबिवली शहरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.
हेही वाचा :