एकच कुटुंबातील 5 जणांना विजेचा झटका लागल्याने मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील वरखेडी येथील घटना
जळगाव जिल्ह्यात विजेचा झटका लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. वरखेडीमध्ये विजेच्या तारांना स्पर्श झाल्यानं ही घटना घडली.

Published : August 20, 2025 at 4:47 PM IST
|Updated : August 20, 2025 at 5:18 PM IST
जळगाव - जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील एका शेतात लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये दीड वर्षाची एक चिमुरडी थोडक्यात बचावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेत मालकास ताब्यात घेतलं आहे. याच शेतामध्ये वन्य जीव जाऊ नये आणि त्यांनी पिकांचं नुकसान करू नये यासाठी झटका तार लावण्यात आलेली होती.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात मसाज रोडवर गट नंबर 21 या शेत आहे. या शेतात मध्यप्रदेश येथील एक कुटुंब कामासाठी आलेले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून हे कुटुंब शेतातच वास्तव्यास होते. कुटुंबात दोन महिला, 42 वर्षीय पुरुष आणि तीन मुलं होती. आज हे कुटुंब शेतात जात असताना त्यांना विजेच्या तारांचा स्पर्श झाला आणि जोरदार विजेचा झटका बसला. या झटक्यातच ४० वर्षीय दोन महिला , ४५ वर्षीय एक पुरुष, 6 वर्षीय मुलगी आणि 8 वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू झाला आहे. तर दीड वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. हा अपघात आहे की घातपात याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.
जळगावचे पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कुटुंब हे मध्य प्रदेशमधून वरखेडी येथे कामाला आले होते. शेतात जात असताना अचानक त्यांना विजेच्या तारांचा झटका बसला आणि त्यातच पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी सदोष मनुष्य वध या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर ज्या शेतमालकाने झटका मशीन लावली होती त्याला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कारवाई सुरू आहे.
घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून शव विच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून ही दुर्घटना आहे की आत्महत्या, हत्या याचा तपास सुरू आहे.
हेही वाचा...

