ETV Bharat / politics

"उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढं यावं, राज ठाकरे तर 100 पावलं पुढं येतील"; मनसेच्या नेत्यांना वाटतं की...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. यावर मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Uddhav Thackeray Raj Thackeray yuti
उद्धव ठाकरे - राज ठाकरे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 6, 2025 at 7:41 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर करू शकतो अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून, महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून अंतर्गत कलह सुरू आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र अद्याप भयाण शांतता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होतील, अशा चर्चा सुरू आहेत. त्या चर्चा म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या आदेशानंतर या चर्चांना सुरुवात झाली. शुक्रवारी शिवतीर्थ येथे झालेल्या मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच पत्रकार परिषद घेत याबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केलं आहे.

मनसेची मुंबईत बैठक : ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच एकत्र येण्याबाबत विधान केलं होतं. या विधानाची चर्चा माध्यमात झाल्यानंतर थेट उद्धव ठाकरे यांनी देखील 'सर्व मतभेद बाजूला ठेवून आपण एकत्र येण्यास तयार' असल्याचे भर सभेत जाहीर केले होते. दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनीच याबाबतची विधानं केल्याने, आता या दोन भावंडांच्या एकत्र याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहेत. शुक्रवारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभाग अध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत देखील दोन्ही भावंडांनी एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

राज ठाकरे 100 पावलं पुढं येतील : "महाराष्ट्रातील जनतेच्या आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. मात्र, युती करायचीच असेल तर उद्धव ठाकरे यांनी फक्त एक पाऊल पुढे यावं. मी तुम्हाला सर्वांसमोर खात्री देऊन सांगतो, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील. आता शिवसेना- मनसे युतीबाबत जे काही लोक बोलत आहेत ते केवळ कॅमेरासमोर बोलत आहेत. आमचे नेते अमित ठाकरे बोलले त्याप्रमाणे दोन्ही भावांकडे एकमेकांचे नंबर आहेत. त्यांनी एकमेकांना फोन करावा. दोन्ही नेते युती करायची की नाही याचा निर्णय घेतील," अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी पुढं यावं : "विभाग अध्यक्षांच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. राज ठाकरे यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला आणि काही सूचना देखील केल्या आहेत. 2014 आणि 2017 मध्ये देखील जनतेच्या मनात काहीतरी होतं. मात्र, जे जनतेच्या मनात होतं ते उद्धव ठाकरे यांच्या मनात नव्हतं. आमचं तोंड दोन वेळा पोळलेलं आहे. तेव्हापासून आम्ही ताक देखील फुकून प्यायला लागलो आहोत. युतीचा प्रस्ताव अद्याप आम्हाला आलेला नाही. युती करायची असेल तर त्यासाठी प्रस्ताव द्यावा लागतो. 2017 मध्ये राज ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव घेऊन बाळा नांदगावकर यांना मातोश्रीवर पाठवलं होतं. पण, उद्धव ठाकरे काही भेटले नाहीत. त्यांनी सुभाष देसाई यांना बाळा नांदगावकर यांची भेट घ्यायला सांगितलं. त्यामुळे युती करायची असेल तर उद्धव ठाकरे यांनी पुढे यावं आणि युतीचा प्रस्ताव ठेवावा." अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

हेही वाचा -

  1. भाजपा-शिवसेनेत 'मोठा-छोटा' भावावरुन रंगलं राजकारण, दोन्हीकडून स्वबळाची भाषा; मुंबईत समीकरण कसंय?
  2. महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
  3. "थेट बातमीच देऊ... महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच...", मनसे-शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य