मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलेल्या ईडीविरोधात काँग्रेसने मुंबईतील टिळक भवन येथील ईडी मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील काँग्रेसचे खासदार देखील यावेळी उपस्थित होते.
सत्यासमोर ते पराजितच होतील : केंद्रातील सरकार सत्तेच्या नशेत आहे. त्यामुळे ते ईडीचा दुरुपयोग करून राहुल गांधी व सोनिया गांधींविरोधात खोटे गुन्हे दाखल करत आहे. या माध्यमातून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मात्र, मोदी सरकारने कितीही जोर लावला व कितीही प्रयत्न केला व कितीही दबाव आणला तरी सत्यासमोर ते पराजितच होतील, असा ठाम विश्वास सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेस नेते आक्रमक : रमेश चेन्निथला यांनी यानंतर पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या व त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे. राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. ही राजकीय सुडबुद्धीतून केलेली कारवाई आहे. मात्र, अशा खटल्यामुळे आम्ही घाबरणार नाही. आमच्या नेत्यांविरोधात आरोपपत्र दाखल केल्याने पक्षाचे मनोबल संपुष्टात येईल असा सत्ताधाऱ्यांचा गैरसमज आहे, मात्र आम्ही केंद्र सरकारच्या या कारवाईला अजिबात घाबरणार नाही."
भाजपावर हल्लाबोल : काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, सत्ताधारी यामध्ये यशस्वी होणार नाहीत, असं चेन्निथला यांनी ठणकावून सांगितलं. काँग्रेसच्या नेत्यांना कमजोर करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातून भाजपा राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. या विरोधात देशभरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 19 एप्रिलला दिल्लीत राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, त्यामध्ये पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न : वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने जे मुद्दे उचलले होते, त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वक्फ दुरुस्ती विधेयकाला स्थगिती दिली असून केंद्र सरकारचे उत्तर मागितले आहे, त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे, असे चेन्निथला म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न याबाबत उपस्थित केले आहेत त्याची उत्तरे केंद्र सरकारने देण्याची गरज आहे. मात्र केंद्र सरकार घाबरले आहे, केंद्र सरकार देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस खासदारांची बैठक : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांची नुकतीच बैठक झाली. संसदेत व रस्त्यावर कोणत्या मुद्द्यांवर लढा द्यावा याबाबत यावेळी चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - धर्मदाय आयुक्तांनी 'त्या' १२ रुग्णालयांवर ठोस कारवाई करावी; महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची मागणी