मुंबई - ३० एप्रिल २०२० रोजी चित्रनगरीचा देखणा राजपूत्र ऋषी कपूरनं या सुंदर जगाचा निरोप घेतला होता. आज पाच वर्षानंतर त्याची आठवण देशाविदेशातील त्याच्या तमाम चाहत्यांना आहे. खरंतर काही वर्षापासून त्याला कर्करोगानं पछाडलं होतं आणि न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर तो भारतात परतला होता. त्याच्या या त्रासदायक काळात पत्नी नितू सिंग त्याच्याबरोबर सावलीसारखी राहिली होती. तो या आजारातून सहिसलामत बाहेर पडेल असं वाटत असतानाच त्याच्यावर काळानं झडप घातली आणि सिनेसाम्राज्याचा हा लाडका राजपुत्र आपल्यापासून दूर निघून गेला.
राज कपूरनी दिली पहिली संधी
ऋषी कपूर यांच्या खानदानाचं हिंदी सिनेसृष्टीच्या विकासातलं योगदान खूप मोठं आहे. त्याचे आजोबा पृथ्वीराज कपूर यांनी भारतीय सिनेसृष्टीचं रोपटं लावलं आणि त्याला वाढवलं. ऋषी कपूरचं संगोपन लाईट, अॅक्शन, कॅमेरा या आवाजाच्या सानिध्यातच झालं. चित्रपटाच्या सेटवरच तो रांगायला आणि चालायलाही शिकला. शूटिंग सेटवरील ट्रॅक, ट्रॉली, क्रेन ही त्याच्यासाठी एक प्रकारची खेळणीच होती. कपूर खानदानात लाडका असलेल्या ऋषी कपूरला रुपेरी पडद्यावर झळकण्याची पहिली संधी त्याचे वडिल राज कपूर यांनीच दिली.
तुम्हाला जर 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट आठवत असेल तर त्यातला ऋषीचा गोड निरागस चेहरा आठवून पाहा. पहिल्याच चित्रपटात अतिशय आत्मविश्वासानं तो कॅमेऱ्याला सामोरं गेला. या सिनेमाकडं सुरुवातीला प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती, तरी यातली गाणी जसंजशी हिट होत गेली तशी थिएटरमध्ये गर्दी व्हायला लागली. या चित्रपटातील राज कपूर यांची भूमिका जितकी लक्षात राहिली तितकाच ऋषी कपूरचाही चेहरा प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला.
ऋषी कपूर यांचं अभिनय प्रेम पाहून राज कपूर यांनी त्याला वयाच्या विशीत असतानाच लॉन्च केलं. १९७३ मध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडियाची भूमिका असलेला बॉबी हा चित्रपट रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर अक्षरशः तुफान चालला. या चित्रपटानंतर हिंदी सिनेसृष्टीला एक नवा हँडसम हिरो मिळाला, ज्यानं या इंडस्ट्रीमध्ये सलग पाच दशकं अधिराज्य केलं.
ऋषी कपूर आणि नितू सिंगची हिट जोडी
१९७५ मध्ये रिलीज झालेल्या 'रफु चक्कर' या चित्रपटात ऋषी कपूर आणि नितू सिंगची जोडी पहिल्यांदा एकत्र आली. त्यापूर्वी दो कलियाँ या चित्रपटात नितूनं बालकलाकार म्हणून दुहेरी भूमिका साकारली होती. सूरज या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलेली नितू सिंग तिच्या आयुष्यात ऋषी कपूरची आयुष्याची साथीदार होईल असं कुणालाही वाटणं शक्य नव्हतं. ऋषी कपूरचं अभिनयात पदार्पण हा कपूर घराण्यासाठी खूप आशादायक गोष्ट होती. त्याच्या पूर्वी पृथ्वीराज कपूरनंतर राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर आणि रणधीर कपूर यांनी अभिनयाची पताका आपल्या खांद्यावर वाहिली होती. ऋषी कपूर नंतर १९८५ मध्ये राजीव कपूरलाही राज कपूर यांनी लॉन्च केलं, परंतु ऋषी कपूर यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत कपूर घराण्याचा अभिनयाचा वारसा शेवटपर्यंत जपल्याचं पाहायला मिळालं.
आयुष्यभर साथ देणाऱ्या नितू सिंग
१९७५ मध्ये 'खेल खेल में' या चित्रपटाच्या सेटवरुन ऋषी कपूर आणि नितू सिंग यांच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली. नितू त्यावेळी केवळ १४ वर्षांच्या होत्या. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं पण त्यांना विवाहासाठी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. ऋषी कपूर आणि नितू सिंग याचा विवाह त्याकाळी टॉक ऑफ द टाऊन ठरला होता. देश विदेशातून असंख्य लोकांच्या उपस्थितीत २२ जानेवारी १९८० ला विवाह पार पडला. ऋषी कपूर आणि नितू सिंग यांनी आयुष्यभर साथ देण्याचा वादा अखेर पर्यंत निभावला. त्यांच्या अखेरच्या श्वासाच्यावेळीही नितू सिंग त्यांच्यासोबत होत्या.
सुपरस्टार्सच्या मांदियाळीत निर्माण केलं स्वतःचं स्थान
ऋषी कपूर जेव्हा सिनेसृष्टी आले तेव्हा राजेश खन्ना, देवानंद, सुनिल दत्त, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, संजीव कपूर, विनोद खन्ना असे तगडे कलाकार रुपेरी पडद्यावर राज्य करीत होते. अशा दिग्गज कालाकाराच्यामध्ये आपलं अस्तित्व निर्माणं करणं हे खूप आव्हानात्मक होतं. याच काळात मनमोहन देसाई यांनी अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर यांना घेऊन 'अमर अकबर अँथोनी' या चित्रपटाची निर्मिती केली. परविन बाबी, नितू सिंग आणि शबाना आझमी अशा नायिका या चित्रपटात होत्या. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान गाजला आणि यातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. यानंतर ऋषी कपूर यांनी 'सरगम', 'दो प्रेमी', 'कर्ज', 'नसिब', 'प्रेमरोग', 'सागर', 'चांदनी' या चित्रपटातून आपल्या देखणेपणा आणि अभिनय सामर्थ्याच्या जोरावर मनात स्थान निर्माण केलं. 'खोज' आणि 'दामिनी' या चित्रपटात त्याच्या भूमिका छोट्या होत्या परंतु या आव्हानात्मक भूमिका त्यानं लीलया साकारल्या.
स्वतंत्र प्रतिमा निर्माण करणारे ऋषी कपूर
तत्कालिन हिंदी सिनेमात जशी हिरोची प्रतिमा होती तसं त्यांचं दिसणं नव्हतं. गुंडांना लोळवणारा, जबरदस्त अॅक्शननं चकित करणारा हिरो त्यानं साकारायचा प्रयत्न केला असला तरी तो त्याचा मूळ पिंड नव्हता. हिरॉईनला इम्प्रेस करणारा चॉकलेट बॉयची प्रतिमा त्यानं स्वीकारली. असंख्य हिरॉईनबरोबर त्यानं पडद्यावर रोमान्स केला. गेल्या पाच दशकात त्यानं सर्व आघाडीच्या कलाकारांबरोबर काम केलं. ऋषी कपूर यांच्या यशस्वी चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. हिंदीमध्ये सुमारे १३० चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. यापैकी पन्नासहून अधिक चित्रपटात त्यांनी नायक म्हणून काम केले. १९७० ते २०१८ या पाच दशकात त्यांनी विविध व्यक्तीरेखा साकारत आपल्यातील अभिनेत्याला आव्हान दिलं. चित्रपटसृष्टीतील लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अफाट क्षमतेच्या अभिनेत्याचं प्रेक्षकांच्या मनातील स्थान अढळ राहणार आहे. ऋषी कपूर यांच्या स्मृतीला 'ईटीव्ही भारत'चे विनम्र अभिवादन.
हेही वाचा -