मुंबई - हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख मनोज बाजपेयीनं अतिशय मेहनतीनं निर्माण केली आहे. सहज नैसर्गिक अभिनय करण्याची अफाट क्षमता त्याच्याकडं आहे. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या या मुलानं आपलं अभिनयाचं प्रेम अगदी लहानपणापासूनच जोपासलं. अभिनेता होण्याचं स्वप्न अनेक वेळा भंगतानाचा कटू अनुभव त्यानं घेतला. आपल्या आशेचा किरण मंदावत असल्याचं पाहून, मनोजनं तीनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्यात त्याच्या मित्रांनी त्याला दिलेली साथ खूप मोलाची होती. त्यानं असं पाऊल पुन्हा उचलू नये यासाठी त्याचे मित्र अगदी सावलीसारखे त्याच्याबरोबर राहिले. अगदी उठता बसताच नव्हे तर झोपतानाही त्याला त्यांनी एकटं सोडलं नाही. आज यशाचं शिखर गाठलेला मनोज बाजपेयी २३ एप्रिल रोजी ५६ वर्षांचे होणार आहेत. या निमित्ताने आपण त्याच्या उज्ज्वल कारकिर्दीबद्दल तसेच त्याच्या मार्गात आलेल्या अडथळ्यांबद्दल जाणून घेऊयात.
अभ्यास करण्याऐवजी अभिनयाकडे कल - अनेक मुलाखतींमध्ये मनोज बाजपेयीनं त्याच्या संघर्षाच्या दिवसांतील बेरोजगारीबद्दल सांगितलं आहे. "मी पाच भावंडांसह वाढलेला एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमचं आयुष्य खूप सोपं होतं, पण जेव्हा जेव्हा आम्हाला शहरात जाण्याची संधी मिळायची तेव्हा आम्ही जाऊन सिनेमा पाहायचो. मी अमिताभ बच्चन यांचा चाहता होतो. मी फक्त ९ वर्षांचा होतो आणि तेव्हाच मी अभिनेता व्हायचं ठरवलं होते. मी १७ वर्षांचा झाल्यानंतर दिल्ली गाठली. इथं जरी मी शिकण्यासाठी आलो होतो तरी अभ्यास करण्याऐवजी मी नाटकात काम करायला सुरुवात केली. याबद्दलची कल्पना माझ्या कुटुंबीयांना नव्हती. परंतु मला अभिनेता व्हायचंय हे मी जेव्हा वडिलांना कळवलं तेव्हा त्यांनी मला २०० पाठवले होते."
दिल्ली ते मायानगरी मुंबईचा प्रवास - मनोज पुढे म्हणाला, "मी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घ्यायचं ठरवलं मात्र, तीनही वेळा मला नकार मिळाला. यामुळं मी निराश झालो आणि आयुष्य संपवण्याचा विचार केला. पण मला माझ्या मित्रांनी वाचवलं. एकदा मी चहाच्या टपरीवर बसलो असताना तिग्मांशू धुलिया आला आणि मला सांगितले की शेखर कपूर बॅंडिट क्वीन हा चित्रपट बनवत आहेत आणि त्यासाठी त्यांना कास्टिंग करायचं आहे. मग मी मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली. मुंबईत पोहोचल्यावर सुरुवातीला मला अनेक अडचणी आल्या. मी पाच मित्रांसह एका चाळीमध्ये खोली भाड्यानं घेतली, परंतु बऱ्याच दिवसात मला काम मिळालं नाही. एकदा तर एका सहाय्यक दिग्दर्शकानं माझा फोटो फाडून टाकला. ३ प्रोजेक्टमधून मला नकार मिळाला. याकाळात माझ्याकडं खाण्यासाठीही पैसे नव्हते. वडापाव खाणं हे देखील माझ्यासाठी चैन झाली होती."
मनोज बाजपेयीचा मुंबईतील संघर्ष - मुंबईत आल्यानंतरही मनोज बाजपेयीला चार वर्षे कामासाठी वाट बघावी लागली. लोकांना वाटायचं की त्याला चांगला चेहरा नाही, पण नशिबानं त्याला साथ दिली आणि आलिया भट्टच्या वडिलांनी त्याला १९९५ मध्ये 'स्वाभिमान' या टीव्ही शोसाठी काम करण्याची संधी दिली. याच्या एका एपिसोडसाठी त्याला १५०० रुपयांचं मानधन मिळालं. हळूहळू त्याच्या कामाची दखल घेतली गेली आणि मग त्याला 'सत्या' हा चित्रपट १९९८ मध्ये मिळाला. या चित्रपटानंच मनोजला फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवून दिली.
मनोज बाजपेयीचे आवर्जुन पाहावेत असे चित्रपट -
- सत्या (१९९८)
- शूल (१९९९)
- बुधा सिंग - बॉर्न टू रन(२०१६)
- गली गुलियां (२०१८)
- गुलमोहर (२०२३)
- जोरम (२०२३)
हेही वाचा -