मुंबई - फेमिना मिस इंडिया २०१२ ची फायनॅलिस्ट बनलेल्या निकिता दत्ताने आपल्या अभिनय आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. टेलिव्हिजनवरील यशस्वी मालिकांमधून ओळख मिळवून तिने चित्रपट आणि वेब सीरीजच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीचा मजबूत पाया रचला. कबीर सिंग, द बिग बुल, डीबूक, रॉकेट गॅंग, खाकी: द बिहार चॅप्टर सारख्या वेब सीरीज आणि चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्यानंतर 'द वेकिंग ऑफ नेशन' मध्ये तिच्या प्रभावी अभिनयानं प्रेक्षकांना भारावून टाकले. आता नेटफ्लिक्सवरील तिचा नवा सिनेमा 'ज्वेल थिफ: द हाईस्ट बिगिन्स' प्रदर्शित झाला असून प्रत्येक भूमिकेसह ती एक बळकट आणि बहुपर्यायी अभिनेत्री म्हणून स्वतःचा ठसा उमटवत आहे. निकितानं आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत गप्पा मारल्या त्यातील काही अंश.
ईटीव्ही भारत - 'द वेकिंग ऑफ नेशन'नंतर 'ज्वेल थिफ: द हाईस्ट बिगिन्स'मधील तुझ्या भूमिकेनं पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. कसं वाटतंय?
निकिता दत्ता : खूप आनंद होत आहे. 'द वेकिंग ऑफ नेशन' माझ्यासाठी खास प्रोजेक्ट होता, पण 'ज्वेल थिफ' माझ्या अभिनय प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. फराह हा रोल करताना खूप वेगवेगळे पैलू अनुभवायला मिळाले आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून वाटतंय की हा प्रयत्न सफल झाला आहे. मी कायम वाट बघत होते अशा भूमिकांची ज्या फक्त ग्लॅमरवर अवलंबून नाहीत. 'फराह'नं मला ती संधी दिली. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचंही प्रेम मिळणं खूपच स्पेशल आहे आणि यामुळे मला पुढं अजून जबाबदारीनं काम आणि निवड करावी लागेल असं वाटतंय.


ईटीव्ही भारत - 'ज्वेल थिफ'मधील 'फराह' या व्यक्तिरेखेबद्दल काही सांगू शकशील? काय विशेष वाटलं या पात्राबद्दल?
निकिता दत्ता : 'फराह' अतिशय संवेदनशील, सुंदर आणि अंतर्मुख व्यक्तिरेखा आहे. बाहेरून शांत दिसणारी पण आतून संघर्ष करणारी स्त्री. अशा अनेक भावना एका भूमिकेतून साकारायच्या होत्या. तिच्या नजरेतून, देहबोलीतून भावना दाखवण्यावर मी विशेष भर दिला.
ईटीव्ही भारत - सैफ अली खानबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
निकिता दत्ता : सैफ सरांबरोबर काम करणं म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. त्यांचा सहज अभिनय आणि इन्टेन्सिटी दोन्ही कमाल आहेत. आम्हा दोघांमध्ये जी केमिस्ट्री दिसते, ती नैसर्गिक आहे आणि त्यामुळे आमचे सीन अजून प्रभावी झालेत.
ईटीव्ही भारत - जयदीप अहलावत आणि कुणाल कपूर यांच्याबरोबर सेटवरचा अनुभव कसा होता?
निकिता दत्ता : जयदीप सरांचा अभिनय इतका प्रभावी आहे की, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. कमीत कमी शब्दात भूमिका कशी सजवायची हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. कुणाल सर एकदम शांत एनर्जी घेऊन सेटवर यायचे. त्यांचा प्रोफेशनॅलिझम अप्रतिम आहे. सेटवरचं आमचं वातावरण खूप सकारात्मक आणि प्रोफेशनल होतं.
ईटीव्ही भारत - दिग्दर्शक कूकी गुलाटी आणि रॉबी ग्रेवाल यांच्याबरोबर काम करताना काय खास अनुभव आले?
निकिता दत्ता : दोन्ही दिग्दर्शकांनी मला पूर्ण मोकळीक दिली की, मी 'फराह' या पात्राला माझ्या पद्धतीनं घडवावं. ते व्हिज्युअली अत्यंत समृद्ध कथा मांडतात आणि कथा सांगतानाही भावनांचा केंद्रबिंदू टिकवतात. त्यामुळे प्रत्येक सीन अधिक प्रभावी झाला. 'ज्वेल थिफ'नं माझ्या करिअरला नवी गती दिली असं म्हणायला वाव आहे.
ईटीव्ही भारत - 'द वेकिंग ऑफ नेशन'मधीलही तुझ्या कामाचे कौतुक झाले होते. त्याचा काय फायदा झाला?
निकिता दत्ता : 'द वेकिंग ऑफ नेशन'मधील माझं काम बऱ्याच जणांना खूप भावलं होतं. त्यात मला माझ्यातील गंभीर आणि भावनिक बाजू मांडायची संधी मिळाली. त्या भूमिकेमुळे लोकांना माझ्यातली विविधता दिसली आणि इंडस्ट्रीत मला नवी ओळख मिळाली.
ईटीव्ही भारत - 'ज्वेल थिफ'मध्ये असं काय खास आहे जेणेकरून प्रेक्षकांनी हा सिनेमा बघावा?
निकिता दत्ता : 'ज्वेल थिफ' हा फक्त एक स्टायलिश थ्रिलर नाही, तर त्यात भावनांचे, नात्यांचे विविधांगी पदर आहेत, अनेक सुंदर थर आहेत. जबरदस्त परफॉर्मन्सेस, आकर्षक लोकेशन्स, आणि गुंतवून ठेवणारी कथा असं सगळं काही आहे. मला खात्री आहे, प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळेल.
हेही वाचा :