मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीत रुपेरी पडद्यावर धमाकेदार कमाई करणारा चित्रपट 'छावा' सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट २०२५मधील सर्वाधिक कमाई करणार हिंदी चित्रपट ठरला. या चित्रपटामध्ये बॉलिवूड स्टार विकी कौशल आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानं प्रमुख भूमिकेत काम केलंय. या चित्रपटात विकीनं दमदार अभिनय केला होता, त्यामुळे या चित्रपटाचे यशाचे श्रेय अनेकजण अभिनेत्याला देत आहे. दरम्यान 'छावा' चित्रपटाबाबत चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांचं मत थोड वेगळं आहे. त्यांनी या चित्रपटाच्या यशाचे श्रेय महाराष्ट्रातील प्रेक्षकांना दिलंय.
'छावा' चित्रपटाबद्दल महेश मांजरेकरचं मत : 'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये विकीनं छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. विकीनं साकारलेली ही भूमिका अनेकांना पसंत आली होती. मांजरेकर यांनी मिर्ची मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "प्रेक्षक विक्कीला पाहण्यासाठी नाही, तर मोठ्या पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत होते." मांजेकर यांनी पुढं सांगितलं, "विकी कौशल हा खूप चांगला अभिनेता आहे. त्याच्या 'छावा' चित्रपटानं ८०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र विकी कौशल हे कधीच म्हणू शकत नाही की, लोक त्याला पाहण्यासाठी आले होते, आता यापूर्वीचे त्याचे पाच चित्रपट पाहण्यासाठी देखील प्रेक्षक जाऊ शकले असते. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक हे पात्र पाहण्यासाठी आले होते. त्याचे शेवटचे पाच चित्रपट रुपेरी पडद्यावर चालले नाहीत."
'छावा' चित्रपटाचे यशाचे श्रेय : मांजरेकर यांनी पुढं म्हटलं, "माझ्या महाराष्ट्रानं हिंदी चित्रपट उद्योग वाचवला आहे. आज 'छावा' बॉक्स ऑफिसवर चांगल काम करत आहे, याचं ८० टक्के श्रेय महाराष्ट्राला जाते, खरं तर, ९०% श्रेय पुणे आणि आसपासच्या परिसरांना जाते. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जे या उद्योगाला वाचवू शकते." 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला, मात्र विकी कौशलचे शेवटचे दोन चित्रपट 'बॅड न्यूज' आणि 'सॅम बहादूर' बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. दरम्यान 'छावा' चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ब्लॉकबस्टर चित्रपटात विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची शक्तिशाली भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. तसेच रश्मिका मंदान्नानं छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई भोसलेची भूमिका केली आहे. याशिवाय चित्रपटामध्ये अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा :