मुंबई - अजय देवगण, वाणी कपूर आणि रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेला 'रेड २' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून त्यातील एक गाणे 'तुम्हे दिल्लगी' नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. सध्या या गाण्यातील अजय देवगण आणि वाणी कपूरच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगलीय. प्रेक्षकांना त्यांची ही केमेस्ट्री अतिशय आवडल्याचं दिसत आहे. उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या या अजरामर गझलेला एका नव्या भावविश्वात गुंफण्यात आलं आहे. रोचक कोहली यांच्या सर्जनशील संगीतरचनेत, जुबिन नौटियालच्या मनात घर करून राहणाऱ्या आवाजात आणि मनोज मुंतशीर व पुर्नम अलाहाबादी यांच्या सजीव शब्दांत 'तुम्हे दिल्लगी' पुन्हा एकदा प्रेम, तगमग, आणि अबोल भावनांची कथा सांगत आहे.
एका रंगतदार सणाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेलं हे गाणं, अजय देवगण आणि वाणी कपूर यांच्या सौम्य पण हळव्या नात्याचा सुंदर क्षण उलगडतं. जिथे प्रेमाच्या नव्या धाग्यांची वीण घातली जाते, तिथेच कुठे तरी अजयच्या पात्राच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाची चाहूलही लागते, ही द्विधा मनःस्थिती या गाण्यात अत्यंत सुरेखरीत्या व्यक्त होते.
जुबिन नौटियाल गझलेच्या या नव्या आवृत्तीविषयी म्हणला की, "‘तुम्हे दिल्लगी’ हे गाणं लहानपणी ऐकलं, तरुणपणी मनात साठवलं, आणि आज एका परिपक्व कलाकार म्हणून पुन्हा अनुभवतो आहे. या गाण्याच्या प्रत्येक सुरात एक अस्फुट वेदना आहे. दोन मनांमधील अबोल भावना असून शून्यातून उमटणारा आवाज हृदयस्पर्शी ठसा उमटवतो."
संगीतकार रोचक कोहली म्हणाले की, "या कालातीत गझलेला नव्याने रचणं ही एक मोठी जबाबदारी होती. मूळ गाण्याचा आत्मा अबाधित ठेवत, त्याला 'रेड २'च्या ८०-९०च्या दशकातील पार्श्वभूमीशी सुसंगत अशी धून देण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या आठवणींना नव्या साजात गुंफणं हा खूप समृद्ध अनुभव होता."

राजकुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ या चित्रपटात अजय देवगणसोबत रितेश देशमुख, वाणी कपूर, सुप्रिया पाठक, सौरभ शुक्ला, अमित सियाल आणि इतर जबरदस्त कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. ‘रेड २’चे निर्माते भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार असून, हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सिरीज प्रस्तुत, पॅनोरमा स्टुडिओजची निर्मिती आहे.
‘रेड २’ १ मे २०२५ रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -
- तब्बल ३८ वर्षानंतर श्रीनगरमध्ये पार पडला बॉलिवूड फिल्मचा प्रीमियर, वाचा या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरलेल्या सई ताम्हणकरचं मनोगत!
- अनुराग कश्यपनं २४ तासात लिहिलेल्या पटकथेनं मनोज बाजपेयी एका रात्रीत झाला होता स्टार
- आपल्या नावाचं उत्तराखंडमध्ये मंदिर असल्याचा उर्वशी रौतेलाचा दावा, अभिनेत्रीच्या विरोधात धार्मिक नेते आक्रमक