नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) मंगळवारी नागरी सेवा परीक्षा 2024चा अंतिम निकाल जाहीर केला. यात उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथल्या रहिवासी शक्ती दुबे यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांनी पाचव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत अव्वल क्रमांक मिळवला. याबाबत, ईटीव्ही भारतचे ब्युरो चीफ आशुतोष झा यांनी शक्ती दुबे यांच्याशी खास बातचीत केली.
सर्वांच स्वप्नं पूर्ण झालं : 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना शक्ती दुबे म्हणाल्या, "आज घरी असताना निकाल जाहीर झाला की नाही, हे पाहण्यासाठी मी सतत फोन तपासत होते. दुपारी माझ्या मोबाईलवर एक पीडीएफ फाइल आली. ती फाईल बघितल्यावर त्या यादीत असलेल्या माझ्या नावावर माझा विश्वासच बसला नाही. मला वाटलं कोणीतरी मला बनावट पीडीएफ पाठवली असेल. पण, जेव्हा मला माझ्या सर्व हितचिंतकांकडून आणि सध्या यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या संस्थेकडून फोन आला तेव्हा, माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्यासह मला आईचाही फोन आला. सर्वांनी माझे अभिनंदन केलं."
सलग तीन परीक्षांमध्ये पीटी उत्तीर्ण होऊ शकले नाही : "2018मध्ये यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीत आले. तेव्हापासून सततच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. स्पर्धेच्या पाचव्या प्रयत्नामध्ये अव्वल स्थान पटकावले. याआधी सलग तीन यूपीएससी परीक्षांमध्ये प्राथमिक परीक्षा (PT) देखील उत्तीर्ण होऊ शकले नव्हते. चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेला बसले, तेव्हा पहिल्यांदा पीटी आणि मेन्स उत्तीर्ण करून मुलाखत दिली. परंतु, त्यावेळी यश आले नाही. पाचव्या प्रयत्नात हा निकाल मिळाला ही महादेवाची कृपा आहे."
करिअरसाठी दुसरा पर्याय असला पाहिजे : "इतर कोणत्याही परीक्षेप्रमाणं, ही परीक्षा गंभीर घेतली पाहिजे, त्यासाठी जोरदार तयारी केली पाहिजे. नक्कीच अभ्यास हा महत्त्वाचा आहे. पण, त्यासोबतच विद्यार्थ्यांनी त्यांच्या करिअरमधील इतर पर्यायांचाही विचार करून त्यासाठी तयारी केली पाहिजे. यूपीएससी परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही."
महाविद्यालयीन शिक्षणानंतर दोन वर्षांची जोरदार तयारी : "यूपीएससी परीक्षेसाठी महाविद्यालयीन शिक्षणानंतरचा अभ्यास खूप महत्त्वाचा बनतो. जर, तुम्ही दोन वर्ष जोरदार तयारी केली, NCERT पुस्तके, सामान्य ज्ञान पुस्तके आणि विषय यावर लक्ष केंद्रीत केलं तर, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. यासाठी 8-10 वर्षे सतत मेहनत घ्यावी लागते असं नाही. पदवीनंतर तयारी आवश्यक आहे." अस शक्ती दुबे यांनी सांगितलं. शक्ती दुबे यांनी अलाहाबाद विद्यापीठातून पदवी आणि बनारस हिंदू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.
यूपीएससीसाठी विषय बदलावा लागला : शक्ती यांनी कॉलेजमध्ये असताना शेवटच्या वर्षी यूपीएससीची तयारी करायचं मनाशी ठरवलं होतं. हे स्वप्न घेऊन त्या दिल्लीत पोहोचल्या. त्यावेळी विषय निवडण्यात त्यांना काही अडचणी आल्या. शक्ती यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. परंतु, हा विषय यूपीएससीमध्ये नसल्यानं त्यांना विषय बदलावा लागला. "मी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय ऐच्छिक विषय म्हणून घेतले. कोणतंही प्रशिक्षण न घेता स्वतः तयारी केली. जीवनशास्त्र विषय ऐच्छिक आहे. मी असा विषय निवडला जो मला सामान्य ज्ञानाशी चांगला मेळ घालणारा वाटला आणि त्यानंतर तयारी सुरू केली," असं शक्ती दुबे यांनी सांगितलं.
वडील यूपी पोलिसात सब-इन्स्पेक्टर : शक्ती दुबे यांचे वडील देवेंद्र दुबे हे यूपी पोलिसात सब-इन्स्पेक्टर आहेत. तर आई गृहिणी आहे. शक्ती दुबे यांनी सांगितलं की, "मी यूपीएससी परीक्षा देत असताना मला माझ्या पालकांकडून पाठिंबा मिळाला. यानंतर ते आमच्या सर्वांसाठी एक स्वप्न बनलं. गेल्या 5-6 वर्षांपासून तयारी केली, आज अखेर त्याला यश मिळालं आहे."
यूपीएससीची तयारी करणाऱ्यांना सल्ला : "जर तुम्ही दिवसांत 8 ते 9 तास परिश्रमपूर्वक अभ्यास केला तर तो पुरेसा आहे. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी यूपीएससीचा अभ्यासक्रम पाहून तयारी करावी. तुम्हाला काय आवश्यक आहे हे माहीत असले पाहिजे. याशिवाय, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार तयारी करा, तर यश नक्कीच मिळेल,' असा सल्ला शक्ती दुबे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
हेही वाचा :