नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी रेल्वेनं एक विशेष ट्रेन चालवली. बुधवारी रात्री कटरा इथून एक विशेष ट्रेन चालवण्यात आली. ही रेल्वे गुरुवारी सकाळी पर्यटकांना घेऊन नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली. जम्मू आणि काश्मीरहून नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या प्रवाशांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनं संवाद साधला.

महाराष्ट्राचे पर्यटक दोन दिवसातच परतले : प्रवासी दीपक तलाजिया म्हणाले की, आम्ही कुटुंबातील सुमारे 12 सदस्यांसह महाराष्ट्रातून 12 दिवसांसाठी जम्मू-काश्मीरला आलो. कटरा इथं श्री माता वैष्णो देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही कुटुंबासह पहलगामला भेट देणार होतो. पण दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही आमचा संपूर्ण कार्यक्रम रद्द केला. 2 दिवसांनी आम्ही परतलो. जम्मू आणि काश्मीरमध्ये बरेच पर्यटक अडकले आहेत. रेल्वेनं विशेष गाड्या चालवल्या असून पर्यटक तिकिटं खरेदी करून सहज परत येत आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलं. आम्हाला फारसा त्रास झाला नाही, तरी कुठेही पर्यटनासाठी जाण्याचं धाडस आम्हाला करता आलं नाही.

दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तणाव : कटराहून नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या प्रवासी भारतीनं सांगितलं की, "आम्ही 21 एप्रिलला कुटुंबासह श्री माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर 2 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले. यामुळे आम्हाला काही काळ समस्यांना तोंड द्यावं लागलं, पण नंतर सर्व काही ठीक झालं. आम्ही पुढं प्रवास करणार होतो, पण दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही विशेष ट्रेननं तत्काळ तिकिटं बुक केली आणि दिल्लीला परत आलो. सुरक्षा व्यवस्था चांगली होती. रेल्वेनं प्रवाशांसाठी विशेष गाड्या चालवून खूप मदत केली."

विशेष ट्रेननं परतलो दिल्लीला : सुबोध सिंह म्हणाले की, "आम्ही जम्मू आणि काश्मीरला भेट देण्यासाठी चार दिवसांचा प्लॅन बनवला होता. दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला भीती वाटत होती, म्हणून आम्ही श्री माता वैष्णो देवीचं दर्शन घेऊन परत आलो. तिथले इतर पर्यटकही घाबरले आहेत. मी नंतर येण्यासाठी दुसऱ्या ट्रेनमध्ये आरक्षण केलं, पण रेल्वेनं विशेष ट्रेन चालवली. मी त्यात तत्काळ तिकीट काढलं आणि दिल्लीला परतलो. दिल्लीत पोहोचल्यानंतर मी सुटकेचा नि:श्वास सोडला." तर सिंगर गुप्ता म्हणाले की, "आमच्याकडं उद्या दिल्लीला परतण्यासाठी तिकिटं होती, पण दहशतवादी हल्ल्यानंतर आम्हाला भीती वाटली. त्यामुळे आम्ही रेल्वेनं चालवलेल्या विशेष ट्रेननं दिल्लीला परतलो."
हल्ल्यानंतर सर्वस्व सोडून परतले : केरळमधील रहिवासी नसीर यांनी सांगितलं की, "कुटुंबातील 10 जणांसह जम्मू आणि काश्मीरला भेट देण्यासाठी ते गेले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर तिथं राहणं सुरक्षित वाटले नाही, म्हणून आम्ही फक्त 7 दिवसांनी तिथून परतलो. आम्ही तिथं हॉटेल बुक केलं. मात्र हल्यानंतर दुसऱ्या ट्रेनचं परतीचे तिकीटही बुक केलं. सैन्य दलांच्या जवानांनी तिथे खूप मदत केली. रेल्वेनंही विशेष गाड्या चालवून प्रवाशांना दिलासा दिला."
कटरा ते दिल्ली विशेष ट्रेन : पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर रेल्वे विभागानं प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष आरक्षित ट्रेन क्रमांक 04614 ही 24 एप्रिलला सकाळी 10:50 वाजता श्री माता वैष्णोदेवी कटरा स्थानकावरून रवाना झाली आहे. ही ट्रेन रात्री 10:40 वाजता प्रवाशांसह नवी दिल्ली स्थानकावर पोहोचेल. ही विशेष ट्रेन शहीद कॅप्टन तुषार महाजन उधमपूर, जम्मू तावी, कठुआ, पठाणकोट कॅन्टोन्मेंट, जालंधर कॅन्टोन्मेंट, लुधियाना जंक्शन आणि अंबाला कॅन्टोन्मेंट यासारख्या प्रमुख स्थानकांवर थांबून नवी दिल्लीला पोहोचेल. या ट्रेनमध्ये एकूण 20 वातानुकूलित कोच आहेत. यात 14 थर्ड एसी, 5 सेकंड एसी आणि 1 फर्स्ट एसी यांचा समावेश आहे.