पाटणा- पुण्यातील भंगार व्यवसायिकाची बिहारमध्ये हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माननपूर गावाजवळ शनिवारी, १२ एप्रिल व्यवसायिकाचा सकाळी मृतदेह आढळून आला. सोमवार १४ एप्रिल रोजी मृतदेहाची ओळख पटली. लक्ष्मण साधू शिंदे असे हत्या झालेल्या व्यवसायिकाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सायबर गुन्हेगारांनी व्यवसायिकाला पाटण्याला बोलावून त्याचं सुरुवातीला अपहरण केलं. त्यानंतर व्यवसायिकाची हत्या केली. या काळात गुन्हेगारांनी व्यवसायिकाला पाटणा, नालंदा आणि जहानाबाद येथे नेले असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे. या हायप्रोफाइल खून प्रकरणाचा तपास पाटणा, जहानाबाद आणि नालंदा पोलीस संयुक्तपणे करत आहेत.
पुण्यातील व्यवसायिकाचा मृतदेह चुनकपूर गावात सापडला. स्थानिक गावातील रहिवासी मुन्ना कुमार यांच्या माहितीनुसार शनिवारी सकाळी शेतामधील पीक पाहण्यासाठी शेतात गेले होते. तेव्हा रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसला. आजूबाजूच्या लोकांना या घटनेची माहिती देण्यात आली. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं लोक तिथे गोळा झाले.
अनोळखी व्यक्तीचा मृतदेह होता. कुठेतरी हत्या करून मृतदेह फेकण्यात आला होता. स्थानिक पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी जहानाबाद येथील रुग्णालयात पाठवला. - मुन्ना कुमार, चुनाकपूर गावचा रहिवासी
घोसी एसडीपीओ संजीव कुमार यांनी सांगितलं, शनिवारी सकाळी माननपूर गावाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जहानाबाद येथे पाठवला. हा मृतदेह पुणे येथील एका भंगार व्यापाऱ्याचा असल्याची ओळख पटली आहे.
हत्येप्रकरणी पाटण्याच्या विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती फक्त पाटणा पोलिसच देऊ शकतात. संजीव कुमार, एसडीपीओ
एसपी अरविंद प्रताप सिंह म्हणाले, शनिवारी सकाळी मृतदेह आढळला. घोसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी मृतदेहाची ओळख पटली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पाटणा, नालंदा आणि जहानाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात सायबर गुन्हेगारांचा सहभाग नाकारता येत नाही. पाटणा पोलीस प्रामुख्यानं या प्रकरणाचा तपास करत आहेत. विमानतळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगार कुठे फिरत होते, याची माहिती आम्हाला मिळाली आहे. गुन्हेगार त्यांना पाटणा, नालंदा आणि जहानाबादमध्ये घेऊन गेले असावेत. त्यांना कोणी बोलावलं? ते कसे आले, याचा तपास सुरू आहे, असे जहानाबादचे एसपी अरविंद प्रताप सिंह यांनी सांगितलं.