नवी दिल्ली- दिल्ली महाराष्ट्र सदन येथे आयोजित आंबा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार असून, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेच्या मध्यमातून दिल्ली येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. कोकणातील देवगड आणि रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात आणि देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकऱ्यांना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने खासदार वायकर यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये 30 एप्रिल ते 1 मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
मुंबईतील खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून आंबा महोत्सवाचे नियोजन : या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाला केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यांतील खासदार आणि आमदारही उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील खासदार रवींद्र वायकर यांनी आंबा महोत्सवाचे नियोजन करून या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व्हावे, यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यानुसार त्यांनी आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास वेळ दिलीय.
अन्य उत्पादक अन् शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे : प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटीदरम्यान व्यक्त केले होते. दिल्लीतील जास्तीत जास्त आंबा प्रेमींनी या महोत्सवाला भेट देऊन कोकणातील आंबा, अन्य उत्पादकांना तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन खासदार रवींद्र वायकर यांनी केलंय.
हेही वाचाः
नवी मुंबई एपीएमसीमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली; दरही उतरले, ग्राहकांना दिलासा